ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणावर २७ जुलैला होणार निर्णय

३१ जुलैपर्यंत ज्ञानवापीची हानी न करता सर्वेक्षण करू ! – पुरातत्व विभागाचे प्रतिज्ञापत्र

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला असलेली स्थगिती अलाहाबाद उच्च न्यायालयाने २६ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी कायम ठेवली आहे. यावर आता २७ जुलैला दुपारी साडेतीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. मुसलमान पक्षाकडून २६ जुलैला झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्वेक्षणाला विरोध करतांना ‘ज्ञानवापीला हानी पोचू शकते’, असा युक्तीवाद करण्यात आला. त्यावर न्यायालयाने पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता. दुपारी साडेचार वाजता पुरातत्व विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या वेळी ज्ञानवापीला कोणतीही हानी होणार नसल्याचे सांगत ‘३१ जुलैपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करू शकतो’, असे सांगितले. त्यानंतर मुसलमान पक्षाने या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. त्यानंतर न्यायालयाने २७ जुलैच्या दुपारी साडेतीन वाजता पुढील सुनावणी ठेवत तोपर्यंत सर्वेक्षणावरील स्थगिती कायम ठेवली.

वाराणसी जिल्हा न्यायालयाने २१ जुलैला हिंदु पक्षाच्या मागणीवरून ज्ञानवापी परिसरातील वजू खाना (नमाजापूर्वी हात आणि पाय धुण्याची जागा) वगळून उर्वरित संपूर्ण परिसराचे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास अनुमती दिली होती. त्याला मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने याला २६ जुलैच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्थगिती देत उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्यानुसार मुसलमान पक्षाने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली.

१. सुनावणीच्या वेळी अंजुमन इंतजामिया मशीद समितीने भूमिका मांडतांना सांगितले की, सर्वेक्षणामुळे ज्ञानवापीची हानी होऊ शकते. जिल्हा न्यायाधिशांना सर्वेक्षण करण्याचा अधिकार नाही.

२. या युक्तीवादाला उत्तर देतांना हिंदु पक्षाने सांगितले की, सर्वेक्षणानंतरच मंदिराच्या रचना योग्यरित्या कळू शकतील. भारतीय पुरातत्व विभाग दोन तंत्रांच्या माध्यमातून सर्वेक्षण करत आहे. यामध्ये छायाचित्रण आणि ‘इमेजिंग’ करण्यात येणार आहे. यामध्ये कोणतीही हानी होणार नाही.

३. यावर न्यायालयाला सर्वेक्षणाचे प्रात्यक्षिक जाणून घ्यायचे आहे, असे सांगत सर्वेक्षणात सहभागी असणार्‍या शास्त्रज्ञांना दुपारी ४.३० वाजता बोलावून घेतले होते.