आलमट्टी धरणातून त्‍वरित विसर्ग वाढवा ! – कृष्‍णा महापूर नियंत्रण समिती

कृष्‍णा महापूर नियंत्रण समितीची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

कोल्‍हापूर – सांगली, सातारा आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यांतील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू आहे. सांगलीत कृष्‍णा नदीची पातळी १८ फुटांवर गेली आहे. कोल्‍हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीकडे जात आहे. सध्‍या आलमट्टी धरणातून केवळ ६ सहस्र ७०० क्‍युसेक्‍स (घनफूट प्रतिसेकंद) विसर्ग चालू आहे. हा विसर्ग किमान १ लाख क्‍युसेक्‍स (घनफूट प्रतिसेकंद) करण्‍याच्‍या सूचना कर्नाटकला द्याव्‍यात, अशा मागणीचे निवेदन महापूर नियंत्रण समितीने मुख्‍यमंत्र्यांकडे पाठवले आहे.

या निवेदनात पुढे म्‍हटले आहे की, या वर्षी पावसाळ्‍यापूर्वी महाराष्‍ट्र आणि कर्नाटक सरकारची सचिव स्‍तरावरील बैठक झाली नाही, ती तात्‍काळ होणे आवश्‍यक आहे.