क्षुल्लक कारणावरून ३ अल्‍पवयीन मुलींचे घरातून पलायन !

नाशिक – आई अभ्‍यास करण्‍यासाठी रागावते आणि मैत्रिणींना भेटू देत नाही, याचा राग मनात धरून एका शाळेतील ३ अल्‍पवयीन मुली घर सोडून गेल्‍या. अंबड पोलीस ठाण्‍यात अपहरणाचा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला; पण पोलिसांनी ८ घंट्यांत त्‍या मुलींना शोधून काढले. (सध्‍याच्‍या पिढीमध्‍ये संयमच राहिला नसल्‍याचे दर्शवणारे उदाहरण ! – संपादक) मुली नाशिक रोड स्‍थानकातून जळगावकडे जाणार्‍या गाडीत बसल्‍याचे सीसीटीव्‍ही चित्रणात दिसले. पोलिसांनी जळगाव रेल्‍वे स्‍थानकातील सीसीटीव्‍ही चित्रण पाहिल्‍यावर त्‍यात मुली जळगावहून पुन्‍हा मुंबईकडे जाणार्‍या गाडीत बसल्‍याचे दिसले. मुलींनी कल्‍याण रेल्‍वे स्‍थानकावरील प्रवाशाच्‍या भ्रमणभाषवरून त्‍यांच्‍या मैत्रिणीला संपर्क केला. पोलिसांनी भ्रमणभाषचे लोकेशन पडताळल्‍यावर ते कल्‍याण रेल्‍वे स्‍थानक परिसरातील असल्‍याचे समजले. पोलिसांनी कल्‍याण रेल्‍वे पोलिसांशी संपर्क करून त्‍या मुलींना कह्यात घेऊन बाल कल्‍याण समितीसमोर उपस्‍थित केले आणि नंतर पालकांकडे सोपवले.