पुढील अधिवेशनापूर्वी १ सहस्र गावांमध्ये हनुमान चालिसा चालू करणार ! – कमलेश कटारिया, अध्यक्ष, संकल्प हिंदु राष्ट्र अभियान, संभाजीनगर

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव – सप्तम दिवस : मान्यवरांचे विचार

रामनाथी (फोंडा), २२ जून (वार्ता.) – हिंदूंची धर्माविषयीची आस्था न्यून झालेली नाही. श्रद्धावान हिंदू त्याच्या वेळेनुसार मंदिरात जातो. या सर्व हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी आम्ही ‘हनुमान चालिसापठण’ हा समानकृती कार्यक्रम निश्‍चित केला आहे. १४ गावांमध्ये आम्ही हनुमान चालिसाचे पठण चालू केले आहे. या वेळी ४ सहस्रांहून अधिक हिंदू एकत्र येतात.

श्री. कमलेश कटारिया

पुढील वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला येण्यापूर्वी १ सहस्र गावांमध्ये हनुमान चालिसा चालू करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात यावे, यासाठी प्रत्येक मासाला आम्ही ‘हिंदू कर्तव्यदिन’ साजरा करतो. यामध्ये प्रत्येक मासाच्या ४ आणि ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषि करावे’, अशी मागणी केली जाते. अशा प्रकारे पत्रांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. हिंदु धर्मावरील सर्व आघातांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा एकमेव उपाय आहे. ‘जागरूक आणि संघटित हिंदूच हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतील, असे वक्तव्य संभाजीनगर येथील संकल्प हिंदु राष्ट्र अभियानाचे अध्यक्ष श्री. कमलेश कटारिया यांनी वैश्विव हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या वेळी केले.