छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या रायरेश्‍वर गडावरून दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्‍थान !

रायरेश्वराहून निघालेली दिंडी

भोर (पुणे) – श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्‍वराज्‍या’ची शपथ घेतलेल्‍या रायरेश्‍वर गड येथून पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्‍थान झाले. रायरेश्‍वर येथील मंदिरात वीणापूजन करून या दिंडीला प्रारंभ झाला. माजी आमदार कै. संपतराव जेथे यांनी चालू केलेल्‍या रायरेश्‍वर पायी दिंडीचे यंदाचे ४५ वे वर्ष आहे. भोर परिसरातील हिरडस, मावळ, आंबवडे खोरे या भागातील आणि भोर तालुक्‍यातील वारकरी प्रतिवर्षी पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करतात. या दिंडीचे आंबवडे येथे स्‍वागत राजगड ज्ञानपीठाच्‍या मानद सचिव स्‍वरूपाताई थोपटे यांनी केले. तेव्हा त्यांनी आंबवडे ते नाटंबीपर्यंत दिंडीसमवेत प्रवास केला.