छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून पुढील पिढीला सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे आपले धर्मकर्तव्य ! – विपुल भोपळे, हिंदु जनजागृती समिती

शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्त सोलापूर येथे व्याख्यान

व्याख्यानात बोलतांना श्री. विपुल भोपळे

सोलापूर, १० जून (वार्ता.) – छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंना सुरक्षित केले. त्यांना स्वाभिमान मिळवून दिला. याचाच आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होऊन पुढच्या पिढीला सुरक्षित आणि स्वाभिमानी वातावरण निर्माण करून देणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विपुल भोपळे यांनी केले. श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने येथील श्री शिवभक्त परिवार बहुउद्देशीय संस्था आणि श्री नागनाथ क्रीडा सांस्कृतिक आणि समाजसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शशिकलानगर येथील श्री नागनाथ मंदिर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्री. विपुल भोपळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

या वेळी श्री नागनाथ मंदिराचे अध्यक्ष श्री. रवि कोळी, यांसह सर्वश्री संजय खडाखडे, श्रीनिवास जाधव, श्रीनिवास वांझरे, रवि कांबळे, विनायक शास्त्री, नितीन जोगे, अरुण कपुरे, महेश चिल्लाळ, सिद्धु धुमाळे, श्री शिवभक्त परिवारचे पालक- गुरुप्रसाद अजगुंडे आणि श्री. अप्पू माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्री नागनाथ महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन आणि आरती करण्यात आली. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला. आभारप्रदर्शन श्री. अप्पू माळी यांनी केले.