भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्ट्रा’ला पर्याय नाही ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

१६ ते २२ जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन !

डावीकडून श्री मनुदेवी संस्थानचे विश्‍वस्त श्री. नीलकंठ चौधरी, समितीचे जिल्हा समनवयक श्री. प्रशांत जुवेकर, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि अधिवक्ता श्री. योगेश पाटील

जळगाव – गोवा येथे गेल्या ११ वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे हिंदु राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही, तर वैश्‍विक पातळीवर होऊ लागली आहे. यामध्ये आता हिंदु राष्ट्राची मागणी करणारी अनेक व्यासपिठे निर्माण झाली आहेत; मात्र दुसरीकडे देशात ‘इस्लामिक स्टेट’च्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात अटक होत आहे. खलिस्तानवादी प्रशासनाला आव्हान देत आहेत, हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या करत आहेत; तर मणीपूर, नागालँड यांसारख्या राज्यांतील हिंदूंची घरे जळत आहेत. काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवले गेले, तरी तेथील हिंदू सुरक्षित नाहीत. देशभरात असंख्य हिंदु मुलींच्या ‘लव्ह जिहादीं’कडून होणार्‍या निर्घृण हत्या पाहता देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. ‘दी केरल स्टोरी’ या चित्रपटाने मांडलेले वास्तव केवळ ‘केरळ’ राज्यापुरते मर्यादित नसून या जिहादी षड्यंत्राची व्याप्ती देशभरात मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. एकीकडे हिंदूंनी भाषण केले की, लगेचच त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चा (द्वेषयुक्त भाषण) गुन्हा नोंद केला जातो; मात्र ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याच्या उघड घोषणा देणार्‍या धर्मांधांवर कारवाई होतांना दिसत नाही. दुसरीकडे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या तपासात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘आय.एस्.आय.एस्.’ हे भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र रचत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याशिवाय पर्याय नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत हेमंत जुवेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि अधिवक्ता योगेश पाटील हे उपस्थित होते.

सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिराचे सचिव प्रा. नीलकंठ चौधरी म्हणाले की, मागील वर्षीच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘मंदिर सुव्यवस्थापन’ या विषयावर झालेल्या दिशादर्शनामुळे या वर्षी जळगाव येथे राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद होऊ शकली. या वर्षीच्या महोत्सवात ‘मंदिर संस्कृती रक्षा’ या विषयावर पुढील नियोजनाच्या दृष्टीने व्यापक मंथन होणार आहे आणि त्यासाठी या वर्षी अनेक मंदिर विश्‍वस्त या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

७ देश आणि भारतातील २८ राज्यांतून येणार हिंदुत्वनिष्ठ !

या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर, बेल्जियम, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील २८ राज्यांतील ३५० हून अधिक हिंदु संघटनांच्या १ सहस्र ५०० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या महोत्सवात हिंदूंवरील अत्याचारांसारख्या विविध विषयांसमवेत हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक असलेल्या विषयांवर विचारमंथन होणार आहे.