शिवराज्‍याभिषेकाचा खर्च मोगलांकडून वसूल !

६ जून १६७४ या दिवशी शिवराज्‍याभिषेक पार पडला. एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च (तेव्‍हा होन ही मुद्रा होती.) या अद्वितीय सोहळ्‍यासाठी आला. हा खर्च छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांकडून कसा वसूल केला ? त्‍याचा प्रसंग आणि गनिमी काव्‍याचे उत्‍कृष्‍ट उदाहरण पाहूया.

नगर जिल्‍ह्यात पेडगाव नावाचे गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा सुभेदार होता. जो महाउद्दाम होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना माहिती मिळाली की, २०० उच्‍च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण

१ कोटी रुपये बहादूरगडावर आहेत. तिथे तैनात केलेली फौजही मोठी होती. ही सगळी मालमत्ता देहलीस रवाना होणार होती. महाराजांनी आज्ञा दिली की, २ सहस्रांचे सैन्‍य बहादूरगडावर चढाई करून तो ऐवज आणि ते २०० अरबी घोडेही लुटून आणावा; पण खानाला ही बातमी मिळाली अन् चष्‍टेने हसत तो म्‍हणाला, ‘‘सिर्फ २ सहस्र मराठा मावला ? उनके लिए तो किले के दरवाजे खोल ही दो. अगर पास भी आ जाए तो खदेड देंगे, काट देंगे ।’’

१. मावळ्‍यांनी बहादूरगडावर आक्रमण करणे; पण मोगलांच्‍या अनपेक्षित आक्रमणाने त्‍यांनी घाबरून पळून जाणे

१६ जुलै १६७४ या दिवशी पेडगावच्‍या त्‍या बहादूरगडातून मोगल सैनिकांना दूरवर धूळ उडतांना दिसली. यावरून घोडदौड येत आहे, हे लक्षात आलेच. गडावर धोक्‍याच्‍या तुतार्‍या वाजल्‍या आणि आधीच सिद्ध होऊन बसलेली खानाची प्रचंड सेना लढण्‍यास पुढे आली. गडाचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तोच खानाच्‍या सेनापतीने चढाईचा आदेश दिला. अनपेक्षित आक्रमणाने मावळे बिथरले. जीव वाचवायला ते मागे फिरले; पण त्‍यांचे घोडे जोर पकडत नव्‍हते. खानाची संपूर्ण फौज जवळ येऊ लागली. नशीब बलवत्तर म्‍हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्‍यांनी पाठ दाखवून धूम ठोकली. बहादूरखान स्‍वतः त्‍यांना अडवायला मोगल सैन्‍याच्‍या पुढे होता. ही घोडदौड अनेक कोस चालत राहिली; कारण बहादूरखानाला मावळ्‍यांच्‍या घोडदौडीतील भीती चेव आणत होती. मावळे पसार झाले, संपूर्ण २ सहस्रांची फौज वाचली खरी; पण आपले शिवबा हरले !

२. बहादूरखानाला मावळ्‍यांनी गाफील ठेवून गडावर आक्रमण करत २०० अरबी घोडे आणि धन नेणे

शेवटी खानाची फौज थांबली आणि एकच जल्लोष झाला; मग सगळे परतू लागले. ही जीत औरंगजेबास कळाली की काय इनाम असेल ? या आनंदाने बहादूरखान छाती फुगवून घोड्यावर डौलात निघाला होता; कारण शिवाजीच्‍या फौजेला पळायला लावणे, हे काही छोटे काम नव्‍हतेच. तितक्‍यात सगळे सैन्‍य शांत झाले आणि डोळे विस्‍फारून दूरवर असलेल्‍या बहादूरगडाकडे बघू लागले. धुराचे मोठे लोट गडातून येत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारले, ‘‘अगर हम सब यहां हैं, तो किलेपर कौन है ?’’ ‘‘कोई नही जहापनाह ! आपका हुकूम था, शिवाजी के उन २ सहस्र मावलो पर सबने चढाई करनी है ।’’ किल्लेदार, सेनापती आणि स्‍वतः खानाचे धाबे दणाणले; कारण काय झाले असणार ? याचा त्‍याला अंदाज आला होता. त्‍यासह छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे ? हेही लक्षात आले. ज्‍याची भीती होती तेच झाले. तो एक घोडेस्‍वार आरडाओरड करत आला, ‘‘हुजूर, गजब हो गया । हम लूट गए, बर्बाद हो गए । आप सब वहां २००० मराठाओं के पीछे दौडे और यहां किलेपर ७००० मराठाओंने धावा बोल दिया. सब लूट के चले गए हुजूर !’’

अशा प्रकारे राज्‍याभिषेकाचा १ कोटी रुपयांचा खर्च ही वसूल झाला आणि २०० उच्‍च प्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्‍या ताफ्‍यात भरती झाले. एकही मावळा न गमावता हे सगळे नाट्य घडले. हे नाट्य घडले कुठे ? तर पेडगावला. खानाला वेडा बनवले, ते त्‍या पेडगावात आणि म्‍हणून ‘पेडगावचे शहाणे’ अन् ‘वेड पांघरून पेडगावला जाणे’, हे दोन वाक्‌प्रचार मराठी भाषेला लाभले.

(साभार : सामाजिक माध्‍यम)