घराणेशाहीमुळे येणार्‍या हुकूमशाहीला भाजपने पूर्णविराम दिला ! – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप

विनोद तावडे

नागपूर – भाजपने या देशातील घराणेशाहीमुळे होणारे राजकारण आणि हुकूमशाही यांना पूर्णविराम दिला आहे. यापूर्वी राजकारणामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार यांचे आरोप सत्ताधार्‍यांवर होत होते. गेल्या ९ वर्षांमध्ये असा कुठलाही आरोप केंद्रातील राजकारणात कुणावरही झालेला नाही. भ्रष्टाचारविरहित सत्ता देता येते, हे भाजपने सिद्ध केले. तरीही विरोधकांचे सातत्याने भाजपला विरोध करणे चालू असते. हा विरोध घराणेशाही पक्षाच्या आधारे चालू असतो, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ६ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. भाजपच्या स्थापनादिनी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी आले असता ते बोलत होते.

विनोद तावडे म्हणाले की, भाजप हा सत्तेसाठी नाही, तर सत्ता ही समाज परिवर्तनाचे साधन आहे, हे मानून काम करणारा पक्ष आहे. याची खूणगाठ प्रत्येक कार्यकर्त्याने मनाशी बांधली आहे. सत्ता हे साधन आहे साध्य नाही. परिवर्तनाचे काम गतीने होण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्ण झोकून देऊन काम करेल.