हुगळी (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात आक्रमण !

  • भाजपचे आमदार बिमान घोष घायाळ !

  • पोलीस मूकदर्शक राहिल्याचा भाजपचा आरोप

मुसलमानबहुल भागात मिरवणुकीवर करण्यात आलेले आक्रमण

हुगळी (बंगाल) – येथे श्रीरामनवमीच्या दिवशी, म्हणजे २ एप्रिलच्या सायंकाळी भाजपकडून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावर रिशरा या मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आले. यात वाहनांना आगी लावण्यात आल्या. या वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारात भाजपचे आमदार बिमान घोष, तसेच अनेक पोलीस घायाळ झाले. घोष यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. येथे आता जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

१. या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजपचे नेते दिलीप घोष म्हणाले की, महिला आणि लहान मुले यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. हावडा येथील हिंसाचारानंतरही राज्य सरकारने संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही.

२. या प्रकरणी आमदार बिमान घोष यांनी राज्यपाल आनंद बोस, तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांची पथके तैनात करण्याची मागणी केली आहे. घोष यांनी पत्रात आरोप केला आहे की, दगड, तलवारी आणि गावठी बाँब यांद्वारे हे आक्रमण नियोजनबद्धरित्या करण्यात आले. त्या वेळी पोलीस मूकदर्शक होते. पोलिसांसमोरच हिंदूंना मारहाण करण्यात आली.

दंगल करणार्‍या गुंडांना चिरडून टाकले जाईल ! – राज्यपाल आनंद बोस

बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी या दंगलीविषयी आश्‍वासन देतांना म्हटले आहे की, आरोपींना रात्रीपर्यंत अटक करण्यात येईल. या गुंडांना पूर्णपणे चिरडून टाकले जाईल. आम्ही राज्यातील अशा प्रकारची जाळपोळ आणि लूटमार नष्ट करण्यासाठी कटीबद्ध आहोत. कायदाद्रोह करणार्‍यांना लवकरच लक्षात येईल की, ते आगीशी खेळत आहेत.

भाजप धार्मिक दंगली भडकावण्यासाठीच ओळखला जातो ! – उद्योगमंत्री पांजा

बंगालचे उद्योगमंत्री शशि पांजा यांनी आरोप केला की, भाजप राज्यातील शांतता भंग करत आहे. भाजप सार्वजनिक संपत्तीला हानी पोचवणे आणि देशभरात धार्मिक दंगली भडकावण्यासाठीच ओळखला जातो. ज्या मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले, त्याचे नेतृत्व भाजपचे नेते दिलीप घोष करत होते. ते चिखावणीखोर विधानांसाठीच ओळखले जातात. (बंगाल राज्य तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हिंसाचारासाठी आणि गावठी बाँबच्या कारखान्यासाठीच ओळखले जाते, असे म्हटल्यास चुकीची ठरू नये ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • बिहार आणि बंगाल येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर सातत्याने होत असलेली आक्रमणे आणि सरकारची निष्क्रीयता पहाता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीच आवश्यकता आहे ! केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे !