उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाच्या पुस्तकांतून मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळले !

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशमध्ये इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना मोगलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. उत्तरप्रदेश शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस्.ई.) यांचा अभ्यासक्रम पालटल्याने त्यातून मोगलांचा इतिहास वगळण्यात आला आहे. नवीन धोरणानुसार १२ वीच्या ‘मोगलांचा भारतातील इतिहास’ या पुस्तकातून ‘मोगल दरबार’ हा धडा वगळण्यात आला आहे. यासह ११ वीच्या पुस्तकातून ‘इस्लामचा उदय’, ‘संस्कृतींमध्ये झालेले मतभेद’, ‘औद्योगिक क्रांती’, हे धडेही हटवण्यात आले आहेत. वर्ष २०२३-२४ या वर्षापासून हा पालट करण्यात आला आहे.

नव्या पिढीला आपला वारसा शिकवणे आवश्यक ! – उपमुख्यमंत्री बृजेश पाठक

उपमुख्यमंत्री बृजेश पाठक

आपली संस्कृती हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. ‘हा वारसा काय होता ?’, हे आपण नव्या पिढीला शिकवले पाहिजे. पुरातन काळातील लोकांची संस्कृती कुठली होती ? हे शिकवलेच गेलेले नाही.

(म्हणे) ‘मोगलांच्या काळात भारताने पुष्कळ प्रगती केली !’ – नवाब इकबाल, माजी शिक्षणमंत्री

नवाब इकबाल

समाजवादी पक्षाचे आमदार आणि उत्तरप्रदेश राज्याचे माजी माध्यमिक शिक्षणमंत्री नवाब इकबाल मेहमूद म्हणाले, ‘‘भाजपाचे सरकार मुसलमान समाजाच्या विरोधात जे काही करता येईल, ते सगळे करत आहे; मात्र इतिहासातून अभ्यासक्रम वगळून काय होणार ? मोगल काळात भारताने पुष्कळ प्रगती केली होती, हे कसे विसरता येईल ? भाजपाकडून केवळ मतांच्या राजकारणासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. ताजमहाल, लाल किल्ला, कुतूबमीनार यांचा इतिहास केवळ भारतासाठीच मर्यादित नाही, तर तो इतिहास सर्व जगाला ठाऊक आहे.

संपादकीय भूमिका 

उत्तरप्रदेशमधील योगी सरकारचा स्तुत्य निर्णय ! देशभर हा निर्णय घेऊन आक्रमणकर्त्यांचे पाठ्यपुस्तकातून होणारे उदात्तीरकण रोखायला हवे !