आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे २ एप्रिलला चिपळुणात प्रकाशन

ज्येष्ठ मूर्तीतज्ञ डॉ. गो.बं. देगलुरकर आणि ज्येष्ठ दुर्गतज्ञ प्र.के. घाणेकर यांची उपस्थिती

चिपळूण – मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक आशुतोष बापट यांनी लिहिलेल्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन २ एप्रिल या दिवशी शहरातील ब्राह्मण साहाय्यक संघ सभागृहात सायंकाळी ५:३० वाजता होणार आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ मूर्तीतज्ञ डॉ. गो.बं. देगलुरकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, आमदार शेखर निकम उपस्थित रहाणार असून या वेळी ज्येष्ठ दुर्गतज्ञ प्र.के. घाणेकर यांचा त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

बापट यांची सफर संगमेश्वर देवरुखची, शिल्पसमृद्ध कोकण, सफर देखण्या महाराष्ट्राची, कोणार्कचे सूर्यमंदिर, सफर ओडिशाची, सफर हंपी-बदामीची, भटकंती आडवाटेवरची, शिल्पसमृद्ध शिवमंदिरे, नदीच्या खोर्‍यात, कंबोडिया, दुर्गांपलीकडला सह्याद्री, पल्लव आणि चोळांच्या देशात, भारतीय कलेतील मिथकशिल्पे आदी पंधरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध दैनिकातून ‘संस्कृतीच्या पाउलखुणा’, ‘आडवाटेवरील वारसास्थळे’, ‘चिंब भटकंती’, ‘२ दिवस भटकंतीचे’ आदी स्तंभलेखनही केले आहे. वर्ष २०२१ मध्ये त्यांना एशियाटिक सोसायटी मुंबईची इंडॉलॉजीसाठी जस्टीस के.टी. तेलंग शिष्यवृत्ती मिळाली होती, तसेच नेपाळ आर्ट कौन्सिल आणि भारतीय दूतावास नेपाळ यांच्या वतीने आयोजित ‘विष्णुमूर्ती’ या विषयावर व्याख्यानासाठी त्यांना काठमांडू येथे आमंत्रित करण्यात आले होते.

चिपळूण-गुहागरच्या इतिहासाचे अनेक पदर ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकातून उलगडण्यात आले आहेत. चिपळूण आणि गुहागर हा एकेकाळी एकच तालुका होता. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके गावावरून नव्हे, तर तेथील किल्ल्यांच्या नावाने ओळखले जात. जुन्या दप्तरात चिपळूणचा उल्लेख ‘तालुके अंजनवेल’ असा मिळतो. अंजनवेल किल्ला हे तालुक्याचे ठिकाण होते. इतकेच नव्हे, तर अंजनवेल येथे न्यायालयही होते, असे देशपांडे यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे. ‘चिपळूणला शिलाहार राजा मल्लिकार्जुन याचा स्तंभलेख मिळालेला आहे. हा शिलालेख मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवलेला आहे. चिपळूण जवळच्या शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर याच राजाने निर्मिलेले नसेल का?’, असा प्रश्न उपस्थित करत अभ्यासकांनी याचा शोध घ्यायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आशुतोष बापट यांनी हा परिसर डोळसपणे पाहून लेखन केल्यामुळे पर्यटकांना चिपळूण आणि गुहागरच्या अप्रसिद्ध स्थानांची माहिती होणार असल्याचे देशपांडे यांनी नमूद केले आहे.

‘लोटिस्मा’च्या वतीने होणारा हा कार्यक्रम साहित्य रसिकांसाठी उत्तम बौद्धिक मेजवानी ठरणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह विनायक ओक, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले आहे.