विधानभवनाच्या पायर्‍या सोडून अन्यत्र उपोषण करण्याची प्रथा नको ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

विधानसभा वृत्त

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण करताना आमदार नितीन देशमुख

मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघातील पाणी योजनेचे ५० टक्के रखडलेले काम चालू करावे, या मागणीसाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांच्या पाणी योजनेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी संमत झाला होता; मात्र कुणीतरी तक्रार केली म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती कशासाठी ? त्यामुळे या प्रश्नी देशमुख यांच्याकडे शासनाचा प्रतिनिधी पाठवून २ दिवसांत अहवाल द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १४ मार्च या दिवशी विधानसभेत केली. याला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशमुख यांच्या तक्रारीची पडताळणी करू; मात्र विधानभवनाच्या पायर्‍यांवर आतापर्यंत बर्‍याच लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले आहे. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याची नवीन प्रथा कुणी पाडू नये. ही पद्धत अयोग्य आहे.