महाराष्‍ट्रात तात्‍काळ धर्मांतरबंदी कायदा करा ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्‍ट्राचा आवाज बुलंद करणारी अंबड येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा !

दीपप्रज्‍वलन करतांना सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, त्‍यांच्‍या डाव्‍या बाजूला श्री. सुनील घनवट, कुमारी रागश्री देशपांडे
श्री. सुनील घनवट

अंबड (जिल्‍हा जालना), २७ फेब्रुवारी (वार्ता.) – शिवप्रतापदिनाच्‍या दिवशी प्रतापगडाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या अफझलखानच्‍या थडग्‍यासभोवतालचे अतिक्रमण महाराष्‍ट्र शासनाने भुईसपाट केले. यासमवेतच आता विशाळगडासह राज्‍यातील सर्वच गड-दुर्ग इस्‍लामी अतिक्रमणातून मुक्‍त करावेत. आदिवासी तरुणींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवून धर्मांध त्‍यांच्‍या भूमी बळकावत आहेत. ख्रिस्‍ती मिशनरी प्रसाद, औषधे यांच्‍या नावाखाली अनेक आदिवासी भागांत हिदूंंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. वर्ष २०१४ मध्‍ये तत्‍कालीन सरकारने न्‍यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन करून ‘महाराष्‍ट्रात तात्‍काळ धर्मांतरबंदी कायदा लागू करण्‍यात यावा’, अशी शिफारस केली होती. त्‍याच धर्तीवर आमची मागणी आहे की, महाराष्‍ट्रात तो कायदा तात्‍काळ लागू करावा. तसेच ज्‍याप्रमाणे अन्‍य ९ राज्‍यांत लव्‍ह जिहादविरोधी कायदा झाला, त्‍याप्रमाणे महाराष्‍ट्रातही तो लागू करावा. लव्‍ह जिहाद, धर्मांतर, गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण, अवैध पशूवधगृहे या सर्व समस्‍यांवर एकमेव उपाय आहे, तो म्‍हणजे हिंदु राष्‍ट्र ! त्‍यामुळे आपण सर्वांनी संघटितपणे यापुढे हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी कृतीप्रवण होऊया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने २६ फेब्रुवारी या दिवशी अंबड येथील दत्ताजी भाले शाळेच्‍या मैदानावर आयोजित हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेप्रसंगी बोलत होते. या सभेला २ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

सभेला उपस्‍थित धर्मप्रेमी

या वेळी सनातनचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्‍या कु. रागेश्री देशपांडे यांनीही उपस्‍थित हिंदूंना संबोधित केले. या सभेसाठी विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्‍या गावांतील धर्माभिमानी हिंदू सहस्रोंच्‍या संख्‍येने उपस्‍थित होते. प्रारंभी शंखनादानंतर मान्‍यवर वक्‍त्‍यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. यानंतर मान्‍यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीला पुष्‍पहार अर्पण केला.

वेदमूर्ती भागवताचार्य योगेश महाराज गोंदीकर, वेदशास्‍त्रसंपन्‍न संतोष गुरु दुधाधारी, वेदशास्‍त्रसंपन्‍न नरेंद्र कुलकर्णी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याचा आढावा समितीच्‍या कु. प्रियांका लोणे यांनी मांडला. सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले.

सभा चालू असतांना समाजकंटकांकडून दगडफेक !

सभा चालू झाल्यावर रणरागिणी शाखेच्या वक्त्या कु. रागेश्री देशपांडे या सभेला संबोधित करत असतांना मैदानाच्या बाहेरून दुचाकीवरून आलेल्या २ जणांनी दगडफेक केली. २ दगड ध्वनीक्षेपक यंत्रणेवर येऊन पडले.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्‍या राष्‍ट्रकार्याला होणारा विरोध करण्‍याचे धैर्य समाजकंटकांना होणे, हे हिंदुत्‍वनिष्‍ठ शासनाच्‍या काळात अपेक्षित नाही ! 
  • चांगल्या कार्यासाठी नेहमी विरोध हा होतच असतो; पण ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ या वचनानुसार जे धर्माच्या बाजूने उभे असतात, देव त्यांचे रक्षण करतोच !