…तर बंगालमधील हिंदूंवर बांगलादेशातील हिंदूंप्रमाणे अत्‍याचार होतील ! – तथागत रॉय, माजी राज्‍यपाल

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘बांगलादेशमधील हिंदूंवर जिहादी आक्रमणे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

श्री. तथागत रॉय

मुंबई – सध्‍या बांगलादेशमध्‍ये हिंदूंवर सतत होत असलेले अत्‍याचार आणि अन्‍य यांविषयी जगभरातून कुणीही बोलत नाही. ज्‍यांचे पूर्वज सध्‍याच्‍या बांगलादेशमधील हिंदू होते, अशा बंगालमधील बहुतांश हिंदूंवर डाव्‍या विचारसरणीचा प्रभाव असल्‍याने तेही बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्‍याचारांकडे दुर्लक्ष करत आहेत; मात्र तो दिवस दूर नाही, जेव्‍हा बंगालमधील हिंदूंवर बांगलादेशमधील हिंदूंप्रमाणे अत्‍याचार होतील ! सरकारने हिंदूंवरील आक्रमणे रोखण्‍यासाठी पुढे यायला हवे, तसेच बंगाल आणि देशात अन्‍य ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे होऊ नयेत, म्‍हणून हिंदूंमध्‍ये जागृती करायला हवी, असे प्रतिपादन त्रिपुरा आणि मेघालय या राज्‍यांचे माजी राज्‍यपाल श्री. तथागत रॉय यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने ‘बांगलादेशमधील हिंदूंवर जिहादी आक्रमणे !’, या विषयावर आयोजित केलेल्‍या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

हिंदुहितासाठी हिंदूंना जागृत करण्‍याच्‍या उद्देशाने विविध ठिकाणी आंदोलने करणे आवश्‍यक ! – अधिवक्‍ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्‍कृती अभ्‍यासक तथा लेखक

अधिवक्ता सतीश देशपांडे

बांगलादेश वर्ष १९७१ मध्‍ये स्‍वतंत्र झाला; मात्र तेथील हिंदूंसाठी आपण काय केले ? तेथील हिंदू कुठल्‍या अवस्‍थेत जगत आहेत ? याविषयी भारतातील हिंदूंना काही देणे-घेणे नाही. गेल्‍याच आठवड्यात बांगलादेशमध्‍ये हिंदूंची १४ मंदिरे तोडण्‍यात आली. याविषयी भारताकडून काहीच प्रतिक्रिया दिली गेली नाही. हिंदू जागृत नसल्‍याने जगभरात अनेक ठिकाणी हिंदूंवर अत्‍याचार होत असतांनाही त्‍याविषयी काहीच आवाज उठवला जात नाही. हिंदुहितासाठी दुसरे कुणीतरी कार्य करील, यावर अवलंबून न रहाता हिंदूंना जागृत करण्‍यासाठी गावागावांत आणि शहरांत आंदोलने झाली पाहिजेत, तर कुठेतरी बांगलादेश किंवा अन्‍यत्र कुठेही हिंदूंवर अत्‍याचार झाल्‍यास त्‍याविषयी कारवाई करण्‍यासाठी सरकारवर दबाव निर्माण होईल.