धारावी (मुंबई) येथे हिंदुत्वनिष्ठांनी पकडून दिलेले गोवंशियांचे मांस पोलीस संरक्षणातून गायब !

  • साहाय्यक पोलीस आयुक्तांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला मांस शीतकपाटात ठेवल्याची दिली खोटी माहिती

  • प्रकरण अंगलट आल्यावर केली सारवासारव !

मुंबई, १६ जानेवारी (वार्ता.) – धारावी येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने पकडून दिलेल्या गोवंशियांच्या मांसातील ५०० किलो मांस पोलीस संरक्षणातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. ‘पोलीस संरक्षणातून गायब झालेले मांस नेमके कुठे गेले ?’, याच्या चौकशीचा फार्स मागील २० दिवसांपासून चालू आहे. मांस गायब झाल्याची चौकशी चालू असतांना याविषयी माहिती घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने या प्रकरणाची चौकशी करत साहाय्यक पोलीस आयुक्त गोविंद गंभीरे यांना माहिती घेण्यासाठी दूरभाष केला असता मांस गायब झाले नसून शीतकपाटात ठेवण्यात आल्याची खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वरिष्ठांपर्यंत पोचल्यावर प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच गंभीरे यांनी दुसर्‍या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दूरभाष करून या प्रकरणाची चौकशी चालू असल्याचे वृत्त लिहिण्यास सांगितले.

१. मांस गायब झाल्याप्रकरणी विश्‍व हिंदु परिषदेचे मुंबई विभागाचे सहमंत्री श्री. राजीवकुमार चौबे यांनी धारावी पोलीस ठाण्यात २५ डिसेंबर २०२२ या दिवशी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार केली होती. यामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी श्री. चौबे यांनी केली आहे. त्यामुळे साहाय्यक पोलीस आयुक्त गंभीरे यांच्याद्वारे या प्रकरणाची चौकशी चालू आहे.

२. गंभीरे यांनी मात्र मांस शीतकपाटात ठेवल्याचे सांगितल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने तक्रारदार श्री. राजीवकुमार चौबे यांना दूरभाष करून ‘याविषयी पोलिसांनी कळवले आहे का ?’, अशी विचारणा केली. त्या वेळी श्री. चौबे यांनी अशा प्रकारे कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. मुळात मांस गायब झाले असल्यामुळेच या प्रकरणाची गोविंद गंभीरे यांच्याद्वारे चौकशी लावण्यात आली आहे. असे असतांना स्वत: गंभीरे यांनी मांस शीतकपाटात असल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्या चौकशीविषयी संशय निर्माण होत आहे.

गोरक्षकांकडून पोलीस निरीक्षक विनोद सालेकर यांच्याविषयी संशय व्यक्त !

गोदामातील मांसाची विल्हेवाट लावण्याविषयी सांगूनही पोलीस निरीक्षक विनोद सालेकर यांनी कार्यवाही करण्यास टाळले. प्रत्यक्षात काही कालावधीनंतर गोदामातील सर्व मांस गायब झाले. या प्रकरणी विश्‍व हिंदु परिषदेने तक्रार केली. त्यात धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद सालेकर यांच्याविषयी संशय व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण ?

२५ डिसेंबर या दिवशी सकाळी श्री. राजीवकुमार चौबे आणि त्यांचे मित्र आशिष कमलाकांत, आशिष बारीक, नवनाथ पाटील यांनी धारावी येथील अशोक मिल नाका येथे गोवंशियांचे मांस अवैध विक्रीसाठी घेऊन येत असलेला टेंपोे पोलिसांच्या साहाय्याने पकडून दिला. या प्रकरणी श्री. चौबे यांनी केलेल्या तक्रारीनंतर धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी मांसाची अवैध वाहतूक करणारा टेंपोचालक वसीम सत्तार अत्तार आणि अवैधरित्या मांसविक्री करणारा गाळ्याचा मालक आबिद रफिक कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्री. चौबे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी टेम्पोतील २ सहस्र किलो मांस कह्यात घेतले. गोरक्षकांच्या साहाय्याने या मासांची विल्हेवाट लावण्यात आली; परंतु गोदामात असलेले ५०० किलो मांस पोलिसांनी कह्यात घेतलेच नाही.

…तर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू ! – राजीवकुमार चौबे, सहमंत्री, विश्‍व हिंदु परिषद, मुंबई विभाग

मांस गायब झाल्याविषयी चौकशी चालू आहे. ‘मांस शीतकपाटात ठेवले आहे’, असे पोलीस सांगत आहते. ‘ते कोणत्या शीतकपाटात ठेवले आहे ?’, हे पोलिसांनी सांगावे. अशा प्रकारे माहिती देऊन पोलिसांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना पोलीस गोवंशियांची हत्या करणार्‍यांना साहाय्य करत असतील, तर राज्यातील हिंदुत्वनिष्ठ शासन अशा अधिकार्‍यांवर कारवाई करेल. गोतस्करांना साहाय्य करणार्‍यांच्या विरोधात आम्ही आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू, अशी प्रतिक्रिया विश्‍व हिंदु परिषदेचे मुंबई विभागाचे सहमंत्री राजीवकुमार चौबे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

(म्हणे) ‘चौकशीला ८-१५ दिवस लागतील !’

साहाय्यक पोलीस आयुक्तांचे विधान !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने साहाय्यक पोलीस आयुक्त गोविंद गंभीरे यांना दूरभाष करून ‘चौकशीला अजून किती दिवस लागतील ?’, असे विचारले असता ‘साधारण ८-१५ दिवस चौकशीला लागतील’, असे सांगितले. (पोलीस पहार्‍यातून मांस गायब होण्याच्या प्रकाराला १ मास होत आला. मुळात त्याची चौकशी करायला एवढा वेळ का लागला आणि आताही या प्रकरणाची चौकशी करायला पोलीस अधिकारी आणखी ८-१५ का घेत आहेत ? यातून पोलिसांची विश्‍वासार्हता आणि कार्यक्षमता यांविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे आहे. – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘पोलिसांचे कर्तव्य हिंदुत्वनिष्ठांनी पार पाडले असतांनाही मांस गायब करण्याचा प्रकार हा गोहत्या करणार्‍यांना वाचवण्यासाठी आहे’, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? धर्मांध कसाई आणि गोतस्कर यांच्याशी साटेलोटे असलेले पोलीस गोहत्या काय रोखणार ?
  • धर्मांधांना पाठीशी घालण्यासाठी स्वतःच गुन्हे करणार्‍या पोलिसांना पदावर रहाण्याचा अधिकार तरी आहे का ?