रस्ता रुंदीकरणासाठी घाटकोपर येथील मंदिर तोडले; मशीद हटवण्याला मात्र बगल !

मुंबई महानगरपालिकेची पक्षपाती आणि कचखाऊ भूमिका !

रस्त्यापासून काही अंतर लांब असलेले श्री साईबाबांचे मंदिर हटवले

मुंबई – एक वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी येथील राधाकृष्ण मंदिर आणि श्री साईबाबा यांचे मंदिर, तसेच येथील ताहिरा मशिद अन् हुसैनी मशीद पाडण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता; मात्र स्थानिकांनी त्याला विरोध केला. प्रशासनाकडून हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कारवाई होते; मात्र अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा प्रश्न येतो, तेव्हा प्रशासन कचखाऊ भूमिका घेत असल्याचा अनुभव असल्यामुळे स्थानिक हिंदूंनी मशिदी आणि मंदिरे दोन्ही एकत्रित पाडण्यात येणार असल्यास कार्यवाहीला अनुकूलता दर्शवली. यानंतर हिंदूंना अंधारात ठेवून १२ डिसेंबर या दिवशी रस्त्यापासून काही अंतरावर असलेले श्री साईबाबांचे मंदिर तोडले; प्रत्यक्षात दोन्ही मशिदींच्या बाजूला अवैध बांधकाम झालेले असूनही मशिदी आणि अवैध बांधकाम यांवर महापालिकेने कारवाई केलेली नाही.

काही मासांपूर्वी पालिका प्रशासनाने या परिसरातील तरुण विकास मंडळाच्या हद्दीतील जुने शौचालय पाडून त्या ठिकाणी नवीन शौचालय बांधले. त्यानंतर मंदिरांमुळे या शौचालयांतील मल तुंबण्याची समस्या, तसेच सांडपाण्याची समस्या निर्माण होईल. त्यामुळे मलनि:सारण वाहिनी टाकावी लागेल. मलनि:सारण वाहिनी न टाकल्यास सांडपाणी तुंबेल. त्यामुळे मंदिर पाडावे लागेल, असे कारण पालिका प्रशासनाने पुढे केले. या वेळी मशिदी आणि मंदिरे एकत्रित तोडण्यात येणार असतील, तरच तोडा, अशी भूमिका हिंदूंनी घेतली. प्रत्यक्षात मात्र हिंदूंना विश्वासात न घेता पालिका प्रशासनाने एक मंदिर तोडण्याची एकतर्फी कारवाई केली; मात्र मशिदी पाडण्याविषयी आता पालिका प्रशासन कचखाऊ भूमिका घेत आहे.

मशिदींच्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या हुसैनी मशिदवर कारवाई नाही

येथील ताहिरा आणि हुसैनी मशिदींच्या शेजारी अवैधपणे बांधकाम वाढवण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामांकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे ? असा प्रश्न स्थानिकांकडून करण्यात येत आहे. येथील स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. सुभाष अहिर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले, ‘‘मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांकडून मशिदी आणि मंदिरे दोन्ही एकत्रित तोडण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात कारवाई करतांना हिंदूंना विश्वासात न घेता श्री साईबाबांचे मंदिर तोडण्यात आले.’’