नावात बरेच काही आहे !

टिपू सुलतान

परकीय आक्रमकांनी बाटवलेली शहरांची नावे पालटली की, मोठा गदारोळ चालू होतो. प्रत्यक्षात आक्रमकांनी आपल्या संस्कृतीवर किती खोलवर आक्रमण केले आहे, त्याची व्याप्ती धक्कादायक आहे. मंदिरे पाडली, मूर्तीभंजन केले, शहरांची नावे पालटली यांसह मंदिरांत होणार्‍या विधींचीही नावे पालटली, हे मंदिरांतील अंतर्गत यंत्रणा भ्रष्ट आणि नष्ट करण्याचेच षड्यंत्र आहे. कर्नाटक राज्यातील चालुवनारायण स्वामी मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये टिपू सुलतानच्या काळापासून सांज आरतीच्या वेळी होणार्‍या आरतीला ‘सलाम आरती’ म्हटले जात होते. टिपू सुलतानने भेट दिल्यामुळे त्याच्या काळापासूनच म्हणजे साधारण ३०० वर्षांपूर्वीपासून हे नाव दिले गेले होते. हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांनी केलेल्या मागणीनंतर आता ६ मासांनी सरकारने या आरतीला ‘संध्या आरती’ असे संबोधण्याचे आदेश दिले आहेत. भाविकांच्या प्रयत्नांना आता यश आले असले, तरी मंदिरातील एखाद्या विधीचेच नाव इस्लामी केले की, कालांतराने त्या मंदिरांवरच नियंत्रण मिळवता येते ! पुढे जाऊन ‘इस्लामी वास्तूवरच आक्रमण होऊन हे मंदिर उभारले आहे; म्हणून नावे अशी इस्लामी धाटणीची आहेत’, असा उलटा प्रचार करण्यासही यांनी अल्प केले नसते. त्यामुळेच परकीय आक्रमकांच्या खुणा मिटवणे, हा संस्कृतीरक्षणातील एक मोठा टप्पा आहे.

मंदिरांचे इस्लामीकरण ही दुखरी नस !

चिक्कमगळुरू येथील दत्तपीठ हे भगवान दत्तात्रयाचे पवित्र स्थान आहे; मात्र मुसलमानांनी त्या जागेवर अतिक्रमण करून त्या जागेवर स्वतःचा दावा सांगितला आहे

कर्नाटकात अशी अनेक स्थाने परकीय आक्रमकांनी बळकावलेली आहेत. ती पुन्हा हिंदूंच्या कह्यात देणे अजून तरी सरकारला शक्य झालेले नाही. चिक्कमगळुरू येथील प्राचीन दत्तपिठाचे झालेले इस्लामीकरण ही तेथील हिंदूंची एक मोठी दुखरी नस आहे. दत्तजयंतीच्या निमित्ताने तेथे पूजा होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मोठा लढा द्यावा लागला होता. आता पूजा चालू झाली आहे, तरीही हिंदु पुजार्‍यांना परत पाठवण्याची मागणी धर्मांध करू लागले आहेत. ‘सौहार्द वेदिके’ संघटनेचे सचिव गौसे मोहिउद्दीन यांनी चिक्कमगळुरू प्रशासनाकडे मागणी केली आहे, ‘येथील दत्तपिठामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या २ हिंदु पुजार्‍यांना परत पाठवले पाहिजे. हा दर्ग्याची संपत्ती बळकावण्याचा डाव असू शकतो.’ मुळात दत्तपीठ हे हिंदूंचेच आहे आणि मुसलमानांनी ते बळकावले आहे. असे असतांना तेथे न्यायालयीन मार्गाने चालू झालेली पूजा थांबवण्यासाठी मागणी करणे, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत ! कर्नाटकात मुसलमानांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर किती प्रमाणात आघात केले आहेत ? आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अजून किती प्रयत्न करायला हवेत, हेच यावरून दिसून येते.

संस्कृतीला बळ देण्याचे कार्य व्हावे !

शेकडो देवस्थानांचे पावित्र्य नष्ट करणार्‍या याच टिपू सुलतानच्या जयंतीचा सरकारी कार्यक्रम काँग्रेस सरकारच्या काळात होत असे. त्यावर आता कर्नाटकातील राज्य सरकारने प्रतिबंध लावले आहेत. आता त्याने भ्रष्ट केलेल्या मंदिरांचे आणि तेथील विधींचे शुद्धीकरण चालू आहे, असेच म्हणता येईल. आतापर्यंतचा इतिहासच आहे की, ज्या ज्या ठिकाणी परकीय आक्रमक आले, त्या त्या ठिकाणची संस्कृती बाटवली गेली. त्याचे पडसाद या घटनांच्या माध्यमातून अजूनही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे करण्यासारखे तसे पुष्कळच आहे; परंतु या निमित्ताने आता समाजही जागृत झाला आहे आणि जनरेट्यापुढे सरकारलाही हिंदुहिताचे निर्णय घेणे भाग पडत आहे. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनीही याविषयी म्हटले आहे, ‘मंदिरांमध्येच आपल्या संस्कृतीला बळ देण्याचे कार्य होणार नाही, तर अन्य कुठे
होणार ?’ खरेच, हिंदू हिंदु संस्कृतीला बळ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्याप्रमाणे हिजाब, आता ‘सलाम आरती’ आदी प्रकरणांमध्ये सरकारने कणखर भूमिका घेतली, त्याप्रमाणे सर्वच देवस्थाने, तेथील प्रथा-परंपरा इस्लामी अतिक्रमणातून मुक्त करण्याचे कार्यही तितक्याच प्रखरतेने पार पाडावे, अशी मागणी आता हिंदूंनी केली पाहिजे.

हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन व्हावे !

कर्नाटकात परकीय आक्रमकांचा किती प्रभाव आहे ? हे तेथील सामाजिक स्थिती वरूनही लक्षात येते. हिजाब प्रकरणातही सर्वाधिक गदारोळ कर्नाटक राज्यात झाला होता. केंद्र सरकारने बंदी घातलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही आतंकवादी कारवाया करणारी संघटनाही कर्नाटकचीच ! सोने तस्करीमध्येही कर्नाटकमधील मुसलमानांचा लक्षणीय सहभाग असतो. थोडक्यात पहाता ‘केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात परकीय आक्रमकांचा प्रभाव दिसून येतो’, असे नाही, तर सामाजिक अन् राष्ट्र यांच्या विरोधी कारवायांद्वारेही हा प्रभाव दिसून येतो. ज्याप्रमाणे सरकारने हे धार्मिक क्षेत्रातील निर्णय कणखरतेने घेतले आहेत, त्याप्रमाणे धर्मांधबहुल क्षेत्रांतील गुन्हेगारी, तस्करी, हिंसक कारवाया आदी नियंत्रणात आणणे, हा कर्नाटक सरकारचा अग्रक्रम असायला हवा. आक्रमकांच्या प्रभावाने राष्ट्रीय भावना नष्ट झालेल्यांना एकतर राष्ट्रीय प्रवाहात आणणे किंवा त्यांच्या आतंकवादी आणि राष्ट्रविरोधी कृत्यांना वेसण घालणे, असे दोनच पर्याय आता सरकारसमोर आहेत. कोणतेही परिवर्तन घडवतांना विरोध होतच असतो. या विरोधाला न जुमानता तेथील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांत परिवर्तन घडवून आणणे आणि हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे, हे कर्नाटक सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. निमित्त एका आरतीच्या नावाचेच आहे; पण त्या निमित्ताने राज्यात मोठ्या पालटांसाठीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सरकार त्यांची पूर्तता करील, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

‘संध्या आरती’ च्या निमित्ताने मोठे परिवर्तन घडावे,  अशी हिंदूंची अपेक्षा !