नागपूर विद्यापिठात ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरी विद्यालया’ची ‘मन व्यवस्थापना’च्या अभ्यासक्रमासाठी निवड !

नागपूर – येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाने आता मानसशास्त्रीय अभ्यासक्रमाच्या कक्षेत मोडणार्‍या ‘मन व्यवस्थापन’ विषयाचे धडे देण्यासाठी ईश्‍वरी शक्तीवर विश्‍वास ठेवणार्‍या ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालया’ची निवड केली आहे. विद्यापिठाच्या इतिहास विभागाने ‘मन व्यवस्थापन’ या विषयावर १० दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला आहे. यासाठी ५० रुपये भरून विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे. (‘मन व्यवस्थापना’च्या अभ्यासक्रमाचे धडे देण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाची निवड केल्याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे अभिनंदन ! मॅकोले शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्याऐवजी भारतातील आध्यात्मिक संस्थांच्या विश्‍वविद्यालयांचे विषय विद्यापिठात ठेवल्यास त्याचा विद्यार्थ्यांना आयुष्यात लाभ होऊ शकतो ! – संपादक)

ध्यान आणि योग अशा मन:शांतीचे शिक्षण प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्‍वविद्यालय देणार ! – डॉ. संगीता मेश्राम, इतिहास विभागप्रमुख, नागपूर विद्यापीठ

नवीन शिक्षण धोरणाने कौशल्य विकास अभ्यासक्रमांवर अधिक भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘मन व्यवस्थापन’ अभ्यासक्रम चालू केला आहे. अनेकांना मन:शांतीची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना याचे ज्ञान मिळावे, हा यामागचा उद्देश आहे. यात ब्रह्माकुमारी संस्थेची निवड करण्यात आली असली, तरी त्यांचा धार्मिकतेशी काहीही संबंध नाही. विद्यार्थ्यांना केवळ ध्यान आणि योग अशा मन:शांतीचे शिक्षण ही संस्था देणार आहे.

(म्हणे) ‘ब्रह्माकुमारी संस्थेच्या संमोहनामुळे अनेक जण बळी पडले !’ – श्याम मानव, संस्थापक, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती

‘ब्रह्माकुमारी संस्थे’चे काम वरपांगी चांगले वाटत असले, तरी तिच्या संमोहनामुळे बळी पडलेल्यांची अनेक प्रकरणे मी स्वत: हाताळली आहेत. (हिंदुद्वेषाची कावीळ झालेले श्याम मानव यांच्याकडून आणखी दुसरी काय अपेक्षा करणार ? – संपादक) विद्यार्थ्यांना जर ‘मन व्यवस्थापना’चे धडे ही संस्था देणार असेल, तर विद्यार्थी त्यांचे स्वातंत्र्य गमावण्याची दाट शक्यता आहे. ब्रह्माकुमारीचे तत्त्वज्ञान हे विवाहनंतरच्याही शारीरिक संबंधाला नकार देते. ‘ही गोष्ट वाईट आहे’, असेच सांगितले जाते. त्यामुळे अशा कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांच्या मनात सामान्य जीवन जगण्याविषयी शंका निर्माण होऊ शकते.’’