(म्हणे) ‘संत परंपरा जाती निर्मूलनासाठी कार्य करत नाही !’ – शिवाजी राऊत, पुरोगामी विचारवंत


सातारा, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील संत परंपरा आणि वारकरी परंपरा केवळ जयघोषाच्या आवर्तनात अडकली आहे. संत परंपरा मूर्तीपूजेच्या पुढे जाऊन जाती निर्मूलनासाठी कार्य करत नाही, हे वास्तव आहे, असा जावईशोध तथाकथित ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत शिवाजी राऊत यांनी लावला. (राज्यात खर्‍या अर्थाने जाती निर्मूलनासाठी पुरोगाम्यांनी नव्हे, तर संतांनीच महान कार्य केले आहे; मात्र स्वत: साधना न करता केवळ जातीद्वेषाच्या चष्म्यातून संतांच्या कार्याकडे पहाणार्‍या पुरोगाम्यांना अध्यात्म, प्रथा-परंपरा, मूर्तीपूजा काय कळणार ? पुरोगाम्यांनीच ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद, हिंदु धर्मावर टीका करून ते जात्यंध आणि हिंदुद्वेषी असल्याचे सिद्ध केले आहे. लोकांचा देवा-धर्मावरील विश्‍वास डळमळीत करणारे आजचे पुरोगामी हे खरेतर अधोगामी आहेत ! – संपादक)


‘सातारा ज्येष्ठ नागरिक संघा’च्या वतीने संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून ‘वारकरी संतांची परंपरा आणि प्रबोधन’ या विषयावर शिवाजी राऊत बोलत होते. व्यासपिठावर संघाचे कार्यवाह तथा विद्रोही चळवळीचे विजय मांडके उपस्थित होते.
शिवाजी राऊत पुढे म्हणाले की, संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत मुक्ताबाई या भावंडांचा जीवनप्रवास क्रांतीकारी आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज हे संस्कृत भाषेला पर्याय देणारे खरे ‘भाषिक शास्त्रज्ञ’ आहेत. याविषयी महाराष्ट्र त्यांचा कायम ऋणी राहील.

(‘अमृताहुनी गोड’ असणार्‍या मराठीला ज्ञानेश्‍वर माऊलींनी जोपासले, वृद्घींगत केले असले, तरी संस्कृतच्या मूळ रचनेचा आधार घेत त्यांनी संस्कृत भाषेचे पूर्णत्व सिद्ध केले आहे. संस्कृत भाषा हीच सर्व भाषांची जननी आहे; कारण मराठीचे मूळच वेद, उपनिषदे, शास्त्रे आदींमध्ये सामावलेे आहे याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून शिवाजी राऊत हेच एका भाषेविषयी द्वेष प्रकट करून समाजामध्ये भाषिक आणि जातीय तेढ निर्माण करत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

संतांचे सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य दुर्लक्ष करून त्यांच्यावर फुकाची टीका करणारे पुरो(अधो)गामी !