राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा !

गोसंवर्धन महासंघ आणि विविध गोप्रेमी संघटना यांचे कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

गोमाता संवर्धन

कोल्हापूर, १० नोव्हेंबर (वार्ता.) – देशाचा अन्नदाता शेतकरी शेती उत्पादन व्यय वाढत असल्याने आर्थिक अडचणीत आहे, तसेच तो आत्महत्या करत आहे. वास्तविक शेती, चिकित्सा आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्याचे रसायन भारतीय देशी गोवंशात आहे. गाय ही भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रतीक आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी, तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन ही काळाची आवश्यकता आहे.

प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन देतांना गोप्रेमी आणि इतर मान्यवर

तरी या संदर्भात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावा, या मागणीचे निवेदन गोसंवर्धन महासंघ आणि विविध गोप्रेमी संघटना यांनी ९ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांना दिले. हे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी स्वीकारले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतप्रमुख (गोसेवा समिती) शेखर धर्माधिकारी आणि ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीकांत कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी गोसेवा समितीचे विठ्ठल मुरकेवार, अनिल जरग, अशोक पोतनीस, कपिल उमराणीकर, संजय चव्हाण, ‘गोसंवर्धन महासंघा’चे अध्यक्ष विजय वरुडकर, ‘आत्मसाहाय्य सामाजिक संस्थे’च्या श्रीमती दीप्ती कदम, ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या सारिका नरवाडे, अमृता जगताप, अल्का लुंगारे उपस्थित होत्या.

करवीरपिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतांना विविध गोप्रेमी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

याच मागणीसाठी करवीरपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. या कार्यात सहभागी होण्यासाठी विजय वरुडकर (७५८८९ ५४५८०), तसेच अशोक पोतनीस (९३२६६०१८६१) यांना त्यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.