परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात सौ. वृंदा मराठे यांना आलेल्या अनुभूती

साधकांना अनुभूतीच्या माध्यमातून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती

सौ. वृंदा मराठे

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर सूक्ष्मातून ‘स्वस्तिक’ आणि ‘ॐ’ अशी शुभचिन्हे दिसणे : ‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात आम्ही (मी आणि यजमान श्री. वीरेंद्र) उपस्थित होतो. मी शरणागत राहून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांकडे पहात होते. तेव्हा मला सूक्ष्मातून ‘त्यांच्या चरणांवर सुदर्शनचक्र गोल फिरत आहे’, असे दिसले. मी त्याकडे एकाग्रतेने पहाण्याचा प्रयत्न केल्यावर मला त्याच ठिकाणी त्रिशूळ दिसू लागले. मी प्रार्थना करत परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांकडे पहात होते. तेव्हा मला त्यांच्या चरणांवर ‘स्वस्तिक’ आणि ‘ॐ’ दिसले. मला अशा प्रकारे चरणांवर भराभर सगळी शस्त्रे आणि दैवी चिन्हे दिसू लागली. ती दृश्ये सतत दिसून अदृश्य होत होती. मला तलवार किंवा त्रिशूळ दिसायचे, तेव्हा त्याचे वरचे टोक बाहेरच्या दिशेला असायचे. कोणत्याही शस्त्राचे टोक वरच्या दिशेने, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या दिशेने नव्हते.

१ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या दोन्ही चरणांच्या अंगठ्यांतून आमच्याकडे शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.

२. सत्संग झाल्यावर पुढचे ४ दिवस सत्संगातील चैतन्याचा परिणाम जाणवणे

सत्संग झाल्यावर पुढचे ४ दिवस ‘मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहेत’, असे मला जाणवले. या ४ दिवसांत अकस्मात् अंगदुखी होत होती. संगणकावर सेवा करतांना मला ‘दीर्घ जांभया येणे, प्रचंड प्रमाणात ग्लानी येणे’, असे होत होते.’ (‘सत्संगातील चैतन्यामुळे साधिकेला आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन तिच्यातील त्रासदायक शक्ती जांभयांच्या माध्यमातून बाहेर पडत होती.’ – संकलक)

– सौ. वृंदा मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक