लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागातील १ सहस्र ५०० रिक्त पदे तातडीने भरणार !

मुंबई – लंपी आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागातील १ सहस्र ५०० रिक्त पदे तातडीने तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या आजारामुळे गुरे गमावलेले  शेतकरी आणि पशूपालक यांना १६ ते ३० सहस्र रुपयांपर्यंत हानीभरपाई देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

ओढकाम करणारी जनावरे (बैल) यासाठी प्रतिजनावर २५ सहस्र रुपये, ३ जनावरांपर्यंत आणि वासरे यांसाठी १६ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत. ओढकाम करणार्‍या ३ लहान जनावरांपर्यंत हे साहाय्य देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांनुसार अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. या निर्णयाची कार्यवाही करण्यासाठी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागातील २९३ पशूधन विकास अधिकारी आणि १ सहस्र १५९ पशूधन पर्यवेक्षक ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

संपादकीय भूमिका 

तहान लागल्यावर विहीर खोदणारे अकार्यक्षम प्रशासन जनहित काय साधणार ?