हिंदी चित्रपटसृष्टीची स्थिती दयनीय ! – चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा

चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आजकाल गुटखा विकत आहेत. त्यांना मोकळा वेळ मिळाला की, ते काही विनोदी किंवा अन्य विषयांवर चित्रपट बनवतात. ५-६ चित्रपट अपयशी ठरल्यानंतरही त्यांना काही फरक पडत नाही. ही खरोखरच दयनीय स्थिती आहे. चित्रपटसृष्टीने स्वतःविषयी चिंतन करण्याची आवश्यकता आहे अन्यथा ज्यांनी त्यांना मोठे केले, तेच त्यांना बुडवतील, असा घरचा अहेर चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी दिला आहे.

प्रकाश झा पुढे म्हणाले, ‘‘गंमत म्हणजे, मोठ्या कलाकारांमुळे कुठलाही चित्रपट यशस्वी होईल, असे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना वाटते; पण प्रेक्षकांना चांगली कथा, त्यांना भेडसावणारी समस्या सांगणारी कथा पहायला आवडते. गेल्या ६ मासांपासून ज्या प्रकारचे चित्रपट येत आहेत आणि प्रेक्षक त्यावर बहिष्कार टाकत आहेत, त्यावरून तरी असेच दिसून येते. वास्तविक चांगल्या चित्रपटांचे दायित्व चित्रपट निर्माते, लेखक आणि ज्या माध्यमावर लोक चित्रपट पहातात यांच्यावर आहे. सध्या ही चित्रपटसृष्टी भूमीवर, आकाशात किंवा मधेेच कुठेतरी लटकलेली आहे, असे वाटते.