दैवी बालके मानवजातीला सुराज्याकडे घेऊन जातील ! – सौ. श्वेता क्लार्क, गोवा

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट’ पुरस्कार प्रदान !

  • ‘दैवी बालक कसे ओळखावे आणि त्याचे संगोपन कसे करावे ?’, या विषयावरील शोधनिबंध ‘ऑनलाईन’ सादर

  • शोधनिबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले असून श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क आहेत सहलेखक !

फोंडा, गोवा – सांप्रतकाळी दैवी बालके पृथ्वीतलावर जन्म घेत आहेत. तीच मानवजातीला सुराज्याकडे घेऊन जातील, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. श्वेता क्लार्क यांनी केले. श्रीलंका येथे आयोजित ‘द फोर्थ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन चिल्ड्रन अँड यूथ २०२२’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत त्या बोलत होत्या. या परिषदेचे आयोजन ‘दी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’ (TIKM) यांनी केले. सौ. श्वेता क्लार्क यांनी ‘दैवी बालक कसे ओळखावे आणि त्यांचे संगोपन कसे करावे’ हा शोधनिबंध ‘ऑनलाईन’ सादर केला. त्याबद्दल त्यांना ‘सर्वोत्कष्ट सादरकर्ता’ पुरस्कराने गौरवण्यात आले. या शोधनिबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे असून, श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क हे सहलेखक आहेत. हे विश्वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमधील ९४ वे सादरीकरण होते.

सौ. श्वेता क्लार्क

सौ. श्वेता क्लार्क पुढे म्हणाल्या की,

१. सध्या साधकांच्या पोटी अनेक उच्च आध्यात्मिक पातळी असलेली बालके जन्म घेत आहेत; म्हणून आम्ही त्यांना ‘दैवी बालक’, असे संबोधतो. त्यांच्यामध्ये आज्ञाधारकपणा, उच्च विचारक्षमता आणि आध्यात्मिक क्षमता, अध्यात्माची ओढ अन् ईश्वराप्रती भाव दिसून येतो. जीवनातील प्रतिकूल प्रसंगांमध्ये ते स्थिर रहातात आणि त्यांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आध्यात्मिक असतो. त्यांच्यामध्ये सूक्ष्मातील सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने जाणण्याची क्षमता असते.

२. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ वापरून केलेल्या एका चाचणीत सूक्ष्म परीक्षणातून ज्ञात झालेली ८ दैवी बालके आणि ३२ सर्वसाधारण बालके यांच्यातील सूक्ष्म-ऊर्जेचे मापन करण्यात आले. सर्वसाधारण बालकांमध्ये अत्यल्प सकारात्मक ऊर्जा, तर पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवले. याउलट दैवी बालकांमध्ये अत्यल्प नकारात्मक ऊर्जा, तर पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. यातील जन्मतः संतपदाच्या आध्यात्मिक पातळीला असलेल्या दोन दैवी बालकांच्या (वय ३ वर्षे) सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळी सर्वोच्च, म्हणजे अनुक्रमे ८२१ आणि ७९३ मीटर होत्या.

३. अन्य एका चाचणीत ३ दैवी बालकांना १ घंटा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप करायला सांगण्यात आला. त्यांच्यातील मुळात अल्प असलेली नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ नामजपानंतर ८६ टक्क्यांनी न्यून झाली, तर सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ८७ टक्क्यांनी वाढली. दैवी बालकांना सकारात्मकता वाढवणारे आणि नकारात्मकता न्यून करणारे उपक्रम शिकवण्यात येतात, उदा. ‘राग’, ‘हट्टीपणा’, ‘आळस’, यांसारखे स्वभावदोष घालवण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया, संगीत-नृत्य आदी विविध कला इत्यादी.

४. पाल्यांवर योग्य संस्कार करणे, ‘ईश्वरप्राप्ती’, हे मूलभूत ध्येय साध्य करण्यासाठी पाल्याला दिशा देणे हे पालकांचे दायित्व आहे.