युवा साधना शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर रत्नागिरी येथील कु. सूरज सूर्यकांत कदम यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

कु. सूरज कदम

१. शिबिराचा पहिला दिवस

१ अ. मनात अनावश्यक आणि नकारात्मक विचार येणे : ‘युवा साधना शिबिरासाठी रामनाथी आश्रमात येईपर्यंत माझ्या मनाची स्थिती चांगली होती; पण शिबिराच्या पहिल्या दिवशी माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक विचार येऊ लागले. ‘शिबिरातून निघून जाऊया’, असे मला वाटत होते.

१ आ. नामजप केल्यावर त्रास न्यून होणे : मी मला होणारे त्रास नियोजन करणार्‍या साधकाला सांगितले. तेव्हा त्यांनी मला उत्तरदायी साधकाला विचारून ४५ मिनिटे नामजप करायला सांगितला. मी तो नामजप ध्यानमंदिरात बसून केल्यावर माझा त्रास न्यून झाला.

१ इ. मानस दृष्ट काढल्यावर बरे वाटणे : उत्तरदायी साधकाने मला स्वतःची मानस दृष्ट काढायला सांगितली. त्या वेळी मी श्री हनुमानाला प्रार्थना केली. तेव्हा मला जाणवले, ‘श्री हनुमानाने नारळ हातांत धरला आहे. मला त्रास देणारी वाईट शक्ती त्या नारळात जात आहे.’ त्यानंतर काही वेळाने मला बरे वाटले.

२. शिबिराचा दुसरा दिवस

या दिवशी आध्यात्मिक त्रासाची वरीलप्रमाणे स्थिती होती; परंतु नियोजन करणार्‍या साधकाला मी याविषयी सांगू शकलो नाही.

३. शिबिराचा तिसरा दिवस

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन चालू झाल्यावर मनात अनावश्यक विचार येऊन ताण येणे : तिसर्‍या दिवशी शिबिरात काही घंटे बरे वाटत होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन चालू झाले. तेव्हा माझ्या मनात अनावश्यक विचार येऊन मला ताण आला. त्यानंतर दिवसभरात काही वेळ माझी स्थिती तशीच होती, तर काही वेळ चांगली होती.’

– कु. सूरज सूर्यकांत कदम, रत्नागिरी (नोव्हेंबर २०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक