उमेश कोल्हे आणि कन्हैयालाल यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या आंदोलनाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

परतवाडा (जिल्हा अमरावती) येथील मुख्य चौकात जमावबंदीचे आदेश !

अमरावती – जिल्ह्यातील परतवाडा येथे काही मुख्य चौकात प्रशासनाने १५ जुलै या दिवशी जमावबंदीचे आदेश दिले. परतवाडा शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरावती येथे घडलेल्या उमेश कोल्हे आणि राजस्थान येथील कन्हैयालाल यांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी ‘शक्ती फाऊंडेशन’च्या वतीने परतवाडा येथील जयस्तंभ चौकात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या नावाने मोठ्या संख्येने ‘पोस्टकार्ड’ पाठवण्याविषयी आंदोलन करण्यात येणार होते; मात्र परतवाडा पोलिसांनी आंदोलनाला अनुमती नाकारली. अचलपूर आणि परतवाडा ही शहरे संवेदनशील असल्याने येथील स्थिती शांत आणि नियंत्रित रहावी, यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले. अचलपूर उपविभागीय अधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असल्याने ५ हून अधिक जणांना एकत्र जाता येणार नाही.