आषाढी वारीच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेकडून वारकर्‍यांना सुविधा देण्याचे नियोजन !

सोलापूर – आषाढी वारीच्या निमित्ताने जिल्ह्यात येणार्‍या वारकर्‍यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूरसह अन्य तालुक्यांतील जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आषाढी वारीनिमित्त जिल्ह्यातील मार्गांवरील ७४ गावांत वारकर्‍यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सिद्ध करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात संतांच्या पालख्या आल्यानंतर वारकर्‍यांना आरोग्यसुविधा देण्यासाठी दीड सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी कर्मचार्‍यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसाठीही तालुक्यांतील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची नियुक्ती पालखी मार्गांवरील गावांत करण्यात आली आहे.