संभाजीनगर येथे भर पावसात सहस्रो मावळ्यांच्या उपस्थितीत ‘शंभू मेळावा-२’ उत्साहात साजरा !

संभाजीनगर – शिवप्रहार प्रतिष्ठान आणि शिव-शंभू भक्त परिवार, महाराष्ट्र यांच्या वतीने ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ व्हावे, याकरता अराजकीय मोहीम ६ मासांपासून चालू आहे. या मोहिमेत विविध पक्ष आणि संघटना यांचे अठरापगड जातीचे शिव-शंभू भक्त सामील झालेले आहेत. ही मोहीम लोकशाही मार्गाने, कुठलीही हिंसा न करता, कोणताही कायदा हातात न घेता, कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध वा समर्थन न करता चालू आहे.

५ जून या दिवशी या मोहिमेच्या माध्यमातून ‘शंभू मेळावा-२’ हा कार्यक्रम १० ते १५ सहस्र मावळ्यांच्या उपस्थितीत संभाजीनगर शहरातील वीर सावरकर मैदान येथे अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात पार पडला. या वेळी उपस्थित मावळ्यांना महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज आणि शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी मार्गदर्शन केले.

माजी पोलीस अधिकारी सूरजभाई आगे म्हणाले, ‘‘शंभूराजांना मारणाऱ्या मारेकऱ्याचे नाव हटवावे आणि शंभू राजांचे नाव कायदेशीररित्या जिल्ह्याला लागावे. जोपर्यंत कायदेशीररित्या संभाजीनगर होत नाही, तोपर्यंत संभाजीनगर नामकरण मोहीम वेगवेगळ्या लोकशाही मार्गांचा अवलंब करून चालू रहाणार आहे. आम्ही राष्ट्रभक्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव हटवण्यासाठी मोहीम काढलेली नसून शंभूराजांचा मारेकरी असलेल्या औरंगजेबाचे नाव हटवण्यासाठी मोहीम आहे.’’

याच मोहिमेच्या माध्यमातून ९ एप्रिल या दिवशी ‘शंभू मेळावा-१’ हा कार्यक्रम वैजापूर शहरात घेतला होता, तसेच नंतरच्या काळात या मोहिमेत जय बाबाजी भक्त परिवार, शांतीगिरीजी महाराज, धर्मयोद्धा संघाचे प्रमुख नागेश्वरजी महाराज, समस्त शिवभक्त मित्र परिवार या संघटनाही सामील झाल्या आहेत. महाराष्ट्रातील पुढील संघटनांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय वारकरी परिषद, हिंदु राष्ट्र सेना, हिंदवी जनक्रांती सेना, हिंदुत्व सिंहनाद, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु साम्राज्य महासंघ, छावा, रोड मराठा उत्थान संघटना पानिपत-हरयाणा, धर्माचार्य मेटे महाराज

क्षणचित्रे

१. या कार्यक्रमाला अठरापगड जातीचे मावळे स्वखर्चाने वाहने करून उपस्थित राहिले.

२. संभाजीनगर, नगर, जालना, जळगाव, सांगली, नाशिक या जिल्ह्यांतून मावळे आले होते.

३. कार्यक्रमाच्या वेळी पाऊस पडत असतांना एकही मावळा जागेवरून हटला नाही आणि उठलापण नाही.

‘औरंगाबाद’ हे नाव काढून शंभूराजांचे ‘छत्रपती संभाजी महाराजनगर’ असे जिल्ह्याचे नाव कायदेशीररित्या करावे. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात संभाजीनगर नामकरणाचा ठराव संमत करावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. मागणी पूर्ण झाली नाही, तर धरणे आंदोलन करून मागणी पूर्ण करण्यासाठी लढा चालू राहील.