ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. राजाराम नरुटे

१. श्री. राजाराम नरुटे यांना संत म्हणून घोषित करण्यापूर्वी

१ अ. १४.३.२०२२ या दिवशी सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन बसल्यावर मला एक वेगळ्या प्रकारची शांतता जाणवत होती. थोड्याच वेळात मला आनंद वाटू लागला. त्याचे कारण मला कळत नव्हते.

१ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ व्यासपिठावर येऊन आसन ग्रहण करत असतांना ‘चारही बाजूंना चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले. त्यांच्याकडे पाहिल्यावर माझा नामजप आपोआप चालू झाला.

श्रीमती पद्मा शेणई

१ इ. श्री. नरुटेकाकांना पाहिल्यावर शांत वाटणे : त्यानंतर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी श्री. राजाराम नरुटेकाकांना व्यासपिठावर येऊन आसन ग्रहण करण्यास सांगितले. त्यांना बघताच मला अतिशय शांत वाटू लागले.

१ ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा  नीलेश सिंगबाळ आणि श्री. नरुटेकाका यांचे संभाषण चालू असतांना ‘आम्ही सर्व साधक पंढरपूरच्या मंदिरात बसलो आहोत अन् स्वतःला पूर्णपणे विसरून गेलो आहोत’, असे मला जाणवले.

२. श्री. राजाराम नरुटे यांना संत म्हणून घोषित केल्यावर

२ अ. सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक सूक्ष्मातील परीक्षण सांगत असतांना पू. नरुटेकाकांचा तोंडवळा साक्षात् पंढरपूरच्या श्री विठ्ठलासारखा दिसणे : श्री. नरुटेकाका यांना संत म्हणून घोषित केल्यावर सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि श्री. राम होनप, हे सर्व जण सोहळ्याचे सूक्ष्मातील परीक्षण सांगत असतांना पू. नरुटेकाकांचा तोंडवळा साक्षात् पंढरपूरच्या श्री विठ्ठलासारखा दिसत होता.

२ आ. शेवटी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘आजची तिथी ‘एकादशी’ आहे’, असे सांगितल्यावर ‘आम्ही सर्व वारकरी श्री विठ्ठलाच्या समोर त्याचे दर्शन घ्यायला बसलो आहोत’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले.

२ इ. हा सोहळा इतका चैतन्यमय आणि आनंदमय होता की, माझे भानच हरपून गेले.

३. तीर्थक्षेत्रांतील चैतन्य खऱ्या अर्थाने रामनाथी आश्रमात अनुभवता येणे

हा सोहळा अनुभवतांना मला गुरुदेवांचे एक वाक्य आठवले, ‘आता तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी चैतन्य, आनंद आणि सात्त्विकता पूर्वीप्रमाणे टिकून राहिली नाही.’ याउलट रामनाथी आश्रमात, म्हणजे या भूवैकुंठामध्ये सर्व तीर्थक्षेत्रांचे खरे चैतन्य आम्हा साधकांना अनुभवता आले.

किती महान आहेत आपले गुरुदेव ! पूर्वी ऋषिमुनींनी निर्माण केलेले चैतन्याचे स्रोत, ज्यांचा आताच्या पिढीला साधा परिचयसुद्धा झालेला नाही, ते सर्व आता या भूवैकुंठात, रामनाथीस्थित श्रीविष्णु (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या सान्निध्यात सर्व साधक अन् बाहेरून आलेले जीव यांनासुद्धा प्राप्त होत आहेत.

गुरुमाऊली आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्रीमती पद्मा शेणई (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), भाग्यनगर सेवाकेंद्र, आंध्रप्रदेश. (१५.३.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक