मध्य रेल्वेच्या फलाट तिकीटदरात पाचपट वाढ !

मुंबई – मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या महत्त्वाच्या स्थानकांवरील फलाटाचा तिकीटदर १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला आहे. ९ ते २३ मे या कालावधीसाठी तिकिटाचे दर वाढवण्यात आले आहेत.

एप्रिल २०२२ मध्ये मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या परिसरात संकटसमयी किंवा आपत्कालीन स्थितीत रेल्वे थांबवण्यासाठी असलेली ‘अलार्म’ साखळी ओढण्याच्या ३३२ घटना घडल्या. यांतील तब्बल २७९ घटनांमध्ये कोणतेही कारण नसतांना ‘अलार्म’ साखळी ओढळ्यात आल्याचे अन्वेषणात आढळून आले. या प्रकरणांतील आरोपींकडून रेल्वे प्रशासनाने ९४ सहस्र रुपये एवढा दंड वसूल केला आहे; मात्र वारंवार होणाऱ्या या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकीटदर वाढीचा निर्णय घेतला आहे.