देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी !

  • भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत मागणी

  • श्रीमद्भगवद्गीतेत जीवनाचे सार असल्याचे प्रतिपादन

श्री. मंगलप्रभात लोढा

मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाविषयी केलेला उपदेश असून हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, याचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे भावी पिढीवर योग्य प्रकारचे संस्कार व्हावेत, यासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये शैक्षणिक पाठ्यपुस्तकांत श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत २२ मार्च या दिवशी केली.

ते म्हणाले, ‘‘शिक्षण व्यवस्थेअंतर्गत शाळेतील अभ्यासक्रमात सरकार पालट करणार आहे’, असे विधान शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. श्रीमद्भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्यात जीवनाचे सार आहे. भारतभर शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश केला जात आहे. तसाच समावेश महाराष्ट्रातही करावा.’’

‘‘गुजरात सरकारने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात गीतेचा समावेश करण्यात येणार आहे’, असे घोषित केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा नैतिक मूल्यांचा ग्रंथ असल्याचे सांगून सकारात्मक संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणव्यवस्थेतही गीतेचा समावेश होणार आहे का ?’’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.