एस्.टी.मध्ये कंत्राटी चालकांची भरती होणार !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) कर्मचार्‍यांचा संप अद्याप चालू आहे. त्यामुळे एस्.टी. वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी शासनाने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सध्या एस्.टी.च्या एकूण कर्मचार्‍यांची संख्या ८१ सहस्र ६८३ असून त्यांतील ३१ सहस्र २३४ कर्मचारी कामावर येत आहेत. त्यामुळे चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणार्‍या संस्थेच्या नियुक्तीसाठी या आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहे. त्यानंतर २० दिवसांत टप्प्याटप्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. संप मिटत नसल्याने यापूर्वी १ सहस्र ७५० कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली आहे. आता आणखी चालकांची भरती करण्यात येणार आहे. सध्या चालक आणि वाहक अशी दोन्ही कामे पार पाडणार्‍या कर्मचार्‍यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाचे काम देण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.