विनातिकीट प्रवाशांकडून रेल्वेने १० मासांत ८० कोटी रुपये वसूल केले !

मुंबई – पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने विनातिकीट, तसेच अनधिकृतपणे सामानाची वाहतूक करणार्‍या प्रवाशांच्या विरोधात राबवलेल्या मोहिमेत १० मासांत ८० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत आरक्षित रेल्वे तिकीटांचे बेकायदेशीर हस्तांतराचे ९ गुन्हे नोंद करण्यात आले असून संबंधितांकडून १३ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मेहिमेत ५४० भिकारी, ६१३ बेकायदेशीर फेरीवाले यांना रेल्वेच्या हद्दीतून हुसकावण्यात आले असून २४२ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ४ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत मुखपट्टी न लावलेल्या १४ सहस्र ४९२ प्रवाशांवर कारवाई केली.