प्रजेचा जराही विचार नसणार्‍या व्यवस्थेला ‘प्रजासत्ताक’ म्हणावे का ? – कु. नारायणी शहाणे, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवक-युवतींसाठी पार पडले ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान !

मुंबई – आज ३२ वर्षांनंतरही काश्मिरी हिंदु स्वतःच्याच देशात विस्थापितांचे जीवन जगत आहेत. भारतियांना ब्रिटिशांचे कारकून बनवण्यासाठी लागू केलेली मेकॉले शिक्षणपद्धती स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही वापरली जाते. महिलांवरील अत्याचारांचे १ लाख ६३ सहस्र खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. याचाच अर्थ या खटल्यांशी संबंधित कोट्यवधी जनता न्यायासाठी वंचित आहे, म्हणजे ज्या देशात प्रजेचा विचार केला जात नाही, त्या व्यवस्थेला प्रजासत्ताक म्हणावे का ? त्यामुळे ही स्थिती पालटण्यासाठी देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हा एकच उपाय आहे अन् त्यासाठी हिंदूंचे संघटन आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या युवा संघटक कु. नारायणी शहाणे यांनी केले. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवक-युवतींसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात त्या बोलत होत्या. या व्याख्यानाचा लाभ अनेक धर्मप्रेमींनी घेतला.

कु. नारायणी शहाणे

या व्याख्यानाचे सूत्रसंचालन सौ. मयुरी शिंदे यांनी केले. आरंभी सौ. मधुरा नेज्जूर यांनी शौर्यजागृती व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. व्याख्यानाच्या शेवटी श्री. हेमंत पुजारे यांनी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चा अर्थ सांगितला आणि त्याच्या गायनाने व्याख्यानाची सांगता करण्यात आली. या वेळी अनेकांनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होण्याची इच्छा उपस्थितांनी प्रदर्शित केली.

धर्मप्रेमींचे मनोगत

१. श्री. चंद्रशेखर शर्मा – ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आपल्या धर्मावर होणारे आघात आणि हिंदु संघटनाचे महत्त्व लक्षात आले.

२. श्री. राहुल कुरली – प्रत्येक बालकाचे भविष्य हे त्याच्या शिक्षणावर अवलंबून असते, लहानपणी तो जे शिकेल, त्याच दिशेने मोठेपणी त्याची वाटचाल होत असते. सध्याच्या शिक्षणपद्धतीत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे आपल्या देशाने गुरुकुलपद्धती पुन्हा अवलंबली पाहिजे.