शब्दांना सांधून (जोडून) त्यांचा जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

९ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘व्यंजनसंधी’ म्हणजे काय ? व्यंजनांचे ‘क्’, ‘च्’, ‘ट्’, ‘त्’ आणि ‘प्’ हे पाच गट; अनुनासिके; कठोर वर्ण; मृदू वर्ण आणि व्यंजनसंधीचा एक प्रकार’, यांविषयी जाणून घेतले. या लेखात व्यंजनसंधीचे पुढील प्रकार पाहू.

(लेखांक ७ – भाग ५)

४. संधीचे प्रकार

४ आ ६. ‘व्यंजनसंधी’चे प्रकार 

(टीप : ‘व्यंजनसंधीच्या ‘४ आ ६ अ’ या प्रकाराची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रविवार, ९ जानेवारी २०२२ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

४ आ ६ आ. व्यंजनांच्या पाच गटांतील ‘कठोर व्यंजनां’पुढे अनुनासिके वगळून ‘स्वर’ किंवा ‘मृदू व्यंजने’ येणे : या संधीविषयी एका उदाहरणाच्या साहाय्याने जाणून घेऊ. व्यंजनांच्या ‘क्’, ‘च्’, ‘ट्’, ‘त्’ आणि ‘प्’ या पाच गटांतील व्यंजनांपैकी ‘ट्’ हे एक ‘कठोर व्यंजन’ आहे. त्याच्या पुढे ‘स्वर’ किंवा ‘मृदू व्यंजन’ आल्यास त्यांचा संधी पुढीलप्रमाणे सिद्ध होतो.

‘षट् + रिपू = ट् + र् = ड् + र् = ड्र्’ यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटच्या ‘ट्’ या कठोर व्यंजनात दुसर्‍या शब्दातील पहिले ‘र्’ हे मृदू व्यंजन मिसळते. त्या वेळी ‘ट्’चा लोप होतो आणि त्याच्या जागी त्याच्याच गटातील ‘ड्’ हे तिसरे व्यंजन येते. अशा प्रकारे संधी होऊन ‘षड्रिपू’ हा जोडशब्द सिद्ध होतो. या प्रकारच्या संधीमध्ये नेहमीच पहिल्या कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच गटातील तिसरे व्यंजन येत असल्यामुळे याला ‘तृतीय-व्यंजन-संधी’ असे म्हणतात. या संधीची अट केवळ एवढीच आहे की, ‘कठोर व्यंजनांच्या पुढे अनुनासिके येता कामा नयेत.’ याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ आ ६ इ. व्यंजनांच्या पाच गटांतील कोणत्याही व्यंजनापुढे ‘अनुनासिक’ येणे : व्यंजनांच्या पाच गटांतील कोणत्याही व्यंजनापुढे ‘ङ्’, ‘ञ्’, ‘ण्’, ‘न्’ आणि ‘म्’ ही ‘अनुनासिके’ आल्यास त्यांचा संधी पुढीलप्रमाणे होतो.

‘वाङ्मय’ या जोडशब्दाचा संधी ‘वाक् + मय = क् + म् = ङ् + म्’ अशा प्रकारे होतो. ‘वाङ्मय’ या जोडशब्दातील पहिल्या शब्दाचे (‘वाक्’चे) शेवटचे व्यंजन ‘क्’ हे व्यंजनांच्या पाच गटांतील एक आहे. दुसर्‍या शब्दातील पहिले व्यंजन ‘म्’ हे अनुनासिक आहे. ही दोन व्यंजने एकत्र येतांना ‘क्’ या व्यंजनाचा लोप होतो आणि त्याच्या जागी त्याच्याच गटातील शेवटचे ‘ङ्’ हे अनुनासिक येते. याला ‘अनुनासिक संधी’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ आ ६ ई. ‘त्’ या व्यंजनापुढे ‘च्’ अथवा ‘छ्’ येणे : असे झाल्यास ‘त्’चा लोप होतो आणि त्याच्या जागी ‘च्’ हे व्यंजन येते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ आ ६ उ. ‘त्’ या व्यंजनापुढे ‘ज्’ हे व्यंजन येणे : असे झाल्यास त्यांचा संधी होतांना ‘त्’ हे व्यंजन लोप पावते आणि त्याच्या जागी ‘ज्’ हे व्यंजन येते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ आ ६ ऊ. ‘त्’ या व्यंजनापुढे ‘ल्’ हे व्यंजन येणे : असे झाल्यास त्यांचा संधी होतांना ‘त्’ हे व्यंजन लोप पावते आणि त्याच्या जागी ‘ल्’ हे व्यंजन येते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ आ ६ ए. ‘त्’ या व्यंजनापुढे ‘श्’ हे व्यंजन येणे : असे झाल्यास ‘त्’ या व्यंजनाचा लोप होतो आणि त्याच्या जागी ‘च्’ हे व्यंजन येते. त्याचबरोबर ‘श्’ या व्यंजनाचाही लोप होतो आणि त्याच्या जागी ‘छ्’ हे व्यंजन येते. याचे उदाहरण पुढे दिले आहे.

‘उत् + शृंखल’ हा संधी होतांना ‘त्’ या व्यंजनाच्या ऐवजी ‘च्’ हे व्यंजन येते आणि ‘श्’ या व्यंजनाच्या ऐवजी ‘छ्’ हे व्यंजन येते. अशा प्रकारे हा संधी ‘उत् + शृंखल = त् + श् = च् + छ्’ असा होतो आणि ‘उच्छृंखल’ हा शब्द सिद्ध होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ आ ६ ऐ. ‘म्’ या व्यंजनापुढे कोणतेही व्यंजन येणे : ‘म्’ या अनुनासिक व्यंजनापुढे कोणतेही व्यंजन आल्यास ‘म्’चा लोप होतो आणि त्याच्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार येतो. ‘सम् + गती’ याचा संधी होतांना ‘म्’ लोप पावतो आणि त्याच्या आधीच्या ‘स’ या अक्षरावर अनुस्वार येतो. अशा प्रकारे ‘संगती’ हा शब्द सिद्ध होतो.

(क्रमशः पुढील रविवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१२.२०२१)