अतिक्रमण काढल्याच्या रागातून ग्रामपंचायत कार्यालय पेटवले !

स्वतः चुकीचे वागून कारवाई झाल्यावर आग लावणार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक 

सातारा, ९ जानेवारी (वार्ता.) – सचिन वसंत धुमाळ यांनी भाडळे ग्रामपंचायत सीमेत अतिक्रमण केले होते. ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढते वेळी धुमाळ यांचे अतिक्रमण काढले होते. त्यामुळे धुमाळ यांनी संतापाच्या भरात ७ जानेवारी या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून ते पेटवून दिले. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे दार आणि विद्युत्पुरवठा करणार्‍या जोडण्या जळाल्या आहेत.

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वाठार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी चौकशी करून सचिन धुमाळ यांना अटक केली. ग्रामसेवक विश्वनाथ आदलिंगे यांनी तक्रार दिली होती. धुमाळ यांना कोरेगाव न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.