विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांचा विरोध !

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – विधानसभा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून उत्तर दिले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेणे, हे घटनाबाह्य आहे, अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. ‘यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार ?’, हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार कि नाही याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवत शिफारस केली होती.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत २ पत्रे पाठवली; मात्र राज्यपालांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत. यानंतर आता मुख्यमंत्री तिसर्‍यांदा राज्यपालांना पत्र पाठवणार आहेत. राज्य सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पालट केला होता. यापूर्वी गुप्त मतदानाने ही निवडणूक घेतली जात होती; मात्र सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम पालटलेला होता. महाविकास आघाडी सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. यानुसार २७ डिसेंबर या दिवशी या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला जाणार होता.

२८ डिसेंबर या दिवशी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही निवडणूक पार पडण्याची शक्यता होती; मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून निवडणूक कार्यक्रमाला संमती देण्यात आली नाही. यासाठी महाविकास आघाडीतील नेते २६ डिसेंबर या दिवशी राज्यपालांना भेटले होते; मात्र राज्यपालांनी ‘मी कायेदशीर अभ्यास करून निर्णय देईन’, असे उत्तर दिले होते. यानंतर २७ डिसेंबर या दिवशी त्यांनी पत्र पाठवत राज्य सरकारला वरील उत्तर दिले आहे.