विधानसभेत हिंदुहिताच्या गोष्टींची चर्चा केव्हा होणार ? – ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

पंढरपूर, २५ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र ही संतांची भूमी असली, तरी विधानसभेत हिंदुविरोधी विधाने आणि कृती होत असल्याचे दिसून येते. हिंदु धर्माचा प्रसार-प्रचार करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि छगन भुजबळ हे करतात; परंतु महाराष्ट्रात गोहत्या, साधूहत्या, हिंदुत्वनिष्ठ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍याला मारहाण, मंदिरांपेक्षा मद्याला प्राधान्य, उर्दू भाषेचा उदोउदो, लव्ह जिहाद, दंगली, ब्राह्मणविरोध अशांविषयी हे मंत्रीमंडळ काहीच बोलत नाही. त्यामुळे विधानसभेत हिंदुहिताच्या गोष्टींची चर्चा केव्हा होणार ? असा प्रश्‍न राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की…

१. गतवेळेस झालेले अधिवेशन हे पितृपक्षात होते. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण आयुष्य हिंदुत्वासाठी दिल्याने पितृपक्षातील ते अधिवेशन हिंदुहितकारी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली.

२. आदरणीय उद्धव ठाकरेजी, आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आम्हा वारकर्‍यांच्या आशा फारच उंचावल्या होत्या.

३. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचे कायद्यात रूपांतर करायचे की नाही, यावर चर्चा चालू असतांना आम्हा वारकर्‍यांचे शिष्टमंडळ ‘मातोश्री’वर भेटी करता आले असतांना आपला संयमी आणि विनम्र स्वभाव याचा आम्हाला प्रत्यय आला आहे.

४. दुसरीकडे नास्तिकतावादी आणि हिंदुद्वेषी मंत्री आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदुविरोधी वक्तव्ये करीत आहेत. हे चित्र स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेणारे ठरत आहे. याचा दोष मात्र आपणाला लागत आहे.

५. स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार हे आपणाला आणि हिंदूंनाही बळ देणारे ठरतील. तेव्हा आपण हिंदुहिताच्या विचारांची बळजोरी मंत्रीमंडळात करावी, अशी आम्ही वारकरी आशा करतो आणि त्यासाठी पांडुरंगाला साकडे घालतो.’’