हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहे ! – जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी)

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश : आवश्यकता आणि उपाय !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

मुंबई – पूर्वीच्या काळी मनुष्याला संपवण्यासाठी राक्षसी शक्ती कार्यरत होत्या. आता ते राक्षस कट्टरपंथीयांच्या रूपात कार्यरत असून आपण त्यांना आतंकवादी म्हणतो. सर्वांत पुरातन अशा सनातन धर्माला संपवण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे; मात्र आम्ही त्यांना हिंदु धर्मात प्रवेशाचा मार्ग दाखवल्यामुळे आज अनेकजण हिंदु धर्मात प्रवेश करू इच्छित आहेत. ते मिळून मिसळून राहू इच्छितात; मात्र हिंदु धर्मात प्रवेश केल्यावर कट्टरपंथीयांपासून छळ होण्याची भीती त्यांना आहे; मात्र ही भीतीही आता न्यून होत आहे. हिंदु धर्मात परत येऊ इच्छिणार्‍यांचे पूर्वी तलवारीच्या बळावर बलपूर्वक धर्मांतर झाले होते; मात्र ते आता हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत. आता हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहे, अशी स्पष्ट भूमिका श्री. जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी) यांनी मांडली. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश : आवश्यकता आणि उपाय’ या ‘ऑनलाईन’ परिसंवादात बोलत होते.

जितेंद्र नारायण सिंह त्यागी

या परिसंवादात श्रीक्षेत्र द्वारापुर, धारवाड येथील ‘श्री परमात्मा महासंस्थानम्’चे श्रीगुरु परमात्माजी महाराज, ‘श्रेष्ठ संघटने’चे संस्थापक अधिवक्ता सत्येंद्र वसिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुराज प्रभु यांनी केले. हा ऑनलाईन कार्यक्रम २ सहस्र २७० जणांनी पाहिला.

हिंदु धर्मात प्रवेश करणार्‍यांचे विशाल हृदयाने स्वागत करा ! – श्रीगुरु परमात्माजी महाराज

श्रीगुरु परमात्माजी महाराज

संपूर्ण विश्वात हिंदु धर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाही, हे सत्य मौलवी आणि पाद्री यांनाही ठाऊक आहे; मात्र खोट्या गोष्टींचा आधार घेऊन ते हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. जे हिंदु धर्मात प्रवेश करू इच्छित आहेत, त्यांना समाजात प्रतिष्ठा आणि मान्यता मिळण्यासाठी हिंदु समाजाने पुढे येऊन एक सुदृृढ योजना आखली पाहिजे. इंडोनेशियासारख्या देशात एकाच वेळी ५० सहस्र मुसलमानांनी हिंदु धर्मात प्रवेश केल्याची अलीकडची घटना आपल्यासमोर आहे. हिंदु धर्मात प्रवेश करणार्‍यांच्या मनात अजून भीती आहे; म्हणून हिंदु समाजाने अशांना सामाजिक पाठिंबा देऊन विशाल हृदयाने त्यांचे स्वागत केले पाहिजे.

पीडित मोठ्या संख्येने हिंदु धर्म अंगीकारत आहेत ! – अधिवक्ता सत्येंद्र वसिष्ठ

अधिवक्ता सत्येंद्र वसिष्ठ

पीडित लोक मोठ्या संख्येने इस्लाम धर्म सोडायला तयार आहेत. हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करणारे कट्टर मार्ग सोडून उदार विचारधारा अंगीकारत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. अशांना हिंदु धर्मात येण्यासाठी योग्य मंच देऊन सामावून घेतले पाहिजे. त्यांचे योग्य पुनर्वसनही करणे आवश्यक आहे.

संपूर्ण देशात इस्लाम धर्म सोडण्याचे वातावरण ! – नरेंद्र सुर्वे

श्री. नरेंद्र सुर्वे

कट्टरतावादामुळे युरोपमध्ये इस्लाम सोडण्याची एक चळवळ उभी राहिली आहे. अनेक जण हातात फलक धरून इस्लाम सोडत असल्याची छायाचित्रे ट्विटरवरून प्रसारित करत आहेत. वॉशिंग्टन येथील ‘प्यू रिसर्च संस्थे’च्या सर्वेक्षणानुसार भारतातील ६ टक्के मुसलमानांना इस्लाममध्ये सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास नाही. असे ६ टक्के लोक सनातन हिंदु धर्मात प्रवेश करू शकतात.