म्हाडाच्या पेपरफुटीच्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करा, अन्यथा पुरावे नष्ट होतील ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

मुंबई – म्हाडाच्या पेपरफुटीचे अन्वेषण संभाजीनगरच्या पोलिसांनी करायला पाहिजे; मात्र पुणे येथील पोलीस अन्वेषण करत आहेत. यामध्ये कुणाचे हित आहे ? पेपरफुटीच्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करा, अन्यथा पुरावे नष्ट होतील, असा आरोप करत अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. संभाजीनगर येथे एस्.टी. कर्मचार्‍यांशी संवाद साधतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘‘एस्.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण रोखण्यासाठी केवळ शरद पवार उत्तरदायी आहेत. सरकारची सिद्धता असेल, तर २० डिसेंबर या दिवशी अंतिम लढाई लढू. संभाजीनगर येथे येण्यापूर्वी मला अनेक ठिकाणी पोलिसांकडून अडवण्यात आले. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. माझे कोणत्या संघटनेचे दुकान नाही. मी कष्टकर्‍यांचा आवाज आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत एस्.टी. विलीनीकरणाचा विषय पुढे नेईन.’’