जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्यावर पैगंबर आणि कुराण यांच्याविषयी बोलण्यास बंदी घालावी ! – अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

भारतात इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे येतात; मात्र त्यांपैकी कुणीही या प्रकरणी पुढे येऊन अशा याचिकांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादकीय

अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र नारायण त्यागी, म्हणजेच पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी यांना महंमद पैगंबर आणि कुराण यांच्याविषयी कोणतेही विधान करण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका ‘हजरत ख्वाजा गरीब नवाज असोसिएशन’चे सचिव महंमद यूसुफ उमर अन्सारी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रविष्ट केली. यात ‘त्यागी यांना प्रसारमाध्यमांशी याविषयी बोलण्यापासून रोखण्यात यावे’, अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्वी त्यागी यांनी महंमद पैगंबर आणि कुराण यांच्याविषयी विधाने केल्याच्या प्रकरणी अन्सारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयालाही पत्र लिहिले आहे.

१. अन्सारी यांनी आरोप केला आहे की, त्यागी यांनी त्यांच्या ‘महंमद’ या पुस्तकामध्ये ‘इस्लामी आतंकवाद’ आणि ‘हुसैनचे बलात्कार कांड’ यांसारख्या शब्दांचा केलेला वापर, हा सामाजिक शांतता आणि सुरक्षा यांच्यासाठी धोकादायक आहे. त्यागी म्हणजे गुन्हेगारी वृत्तीची व्यक्ती आहे. तिच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये २७ गुन्हे नोंद आहेत. तिच्यावर कारवाई करण्यात यावी.

२. अन्सारी यांनी म्हटले आहे की, कुराणला १ सहस्र ४०० वर्षांचा इतिहास आहे; मात्र यावर अद्याप कुणीही प्रश्न उपस्थित केलेला नाही. त्यागी कोणताही धर्म मानत नाहीत. त्यांच्याकडे मानवतेची कमतरता आहे.