‘इस्लामपूर’चे ‘ईश्वरपूर’ हे नामकरण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार !
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हा प्रशासनास निवेदन
सांगली, ११ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाच्या संकीर्ण २०२०/ प्र.क्र. ३३ / दिनांक ६ मे २०२१ नुसार राज्यातील जातीवाचक उल्लेख असलेल्या गावांची नावे पालटण्यात यावीत, असा निर्णय झाला आहे. त्यानुसार ‘इस्लामपूरचे’ नाव पालटून ‘ईश्वरपूर’ ठेवण्यात यावे. लवकरात लवकर ईश्वरपूर हे नामकरण झाले नाही, तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने १० डिसेंबर या दिवशी निवासी जिल्हाधिकारी सौ. मौसमी बर्डे-चौगुले यांना देण्यात आले. (हिंदूबहुल भारतात अशी मागणी का करावी लागते, प्रशासन स्वत:हून कृती का करत नाही ? – संपादक)
जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या देशावर अनेक परकीय आक्रमकांनी आक्रमणे केली. आजही देशातील शहरांची पालटलेली नावे त्याच आक्रमकांच्या नावाने आपल्या देशात विविध गावे आणि शहरे यांना तशीच आहेत. त्या परकीयांच्या खुणा मिटल्या गेल्या पाहिजेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘इस्लामपूर’चे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण केले होते; पण शासनस्तरावर ‘ईश्वरपूर’, असे नामकरण अद्यापही झाले नाही. सध्या हे नामांतरण करण्याच्या संदर्भात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आंदोलन चालू आहे. या मागणीस तेथील स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. ईश्वरपूर नामांतरणासाठी आम्हीही वर्ष २०१५ मध्ये मागणी केली होती. या नामांतरणाच्या मागणीला आम्ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने पाठिंबा देत आहोत.
या वेळी प्रशांत गायकवाड, सतीश खांबे, सचिन देसाई, विशाल गायकवाड, जयदीप सदामते, भूषण गुरव, प्रदीप पाटील, नीलेश चौगुले, प्रतीक पाटील, सूरज शिंदे, कृष्णा पाटील आणि सर्व युवा सहकारी उपस्थित होते.