प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारावे !

‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

मुंबई – वर्ष १६५९, मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी, याच दिवशी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या राक्षसी वृत्तीच्या अफझलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी संपवले. हा दिवस ‘शिवप्रतापदिन’ म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वांत महान १० युद्धांच्या घटनांपैकी मानली जाणारी ही एक घटना विदेशातील सैन्यांना शिकवण्यात येते; मात्र दुर्दैवाने जेथे हा महापराक्रम झाला, तेथे म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी या घटनेविषयी साधी माहिती देणारे एक स्मारकही नाही. यंदा ‘शिवप्रतापदिन’ १० डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात आला. या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्र्यांकडे ‘ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, तेथे भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारावे’, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. पाच मोगली पातशाह्या हिंदुस्थानवर राज्य करत असतांना राजमाता जिजाऊंनी पाहिलेले ‘हिंदवी स्वराज्या’चे स्वप्न पूर्ण करणारा परमप्रतापी हिंदु राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज  आहेत. ‘काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी ना होते, तो सुन्नत होती सबकी ।’ असे कवी भूषण यांच्या काव्यातून ‘छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वानेच आज हिंदु समाज टिकून आहे’, हे लक्षात येते.

२. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा जर प्रत्येक बालमनावर कोरली गेली, तर यापुढेही हिंदु समाजातून शूरवीर पराक्रमी पिढी निश्चितच निपजेल. यासाठी छत्रपती शिवरायांनी केलेल्या ऐतिहासिक पराक्रमाच्या स्थानांवर त्यांची स्मारके व्हायला हवीत.

३. असेच एक महापराक्रमाचे स्थान म्हणजे अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, तो प्रतापगडाचा पायथा ! येथे भव्य असे ‘शिवप्रताप स्मारक’ उभारून त्यामध्ये अफझलखानवधाची भव्य प्रतिकृती साकारण्यात यावी.

या ऐतिहासिक घटनेचा अर्थात् युद्धनीतीचा संपूर्ण बारकाव्यांनिशी उपलब्ध असलेला सचित्र आणि सप्रमाण तपशील या ‘शिवप्रताप स्मारका’मध्ये देण्यात यावा, तसेच या महापराक्रमाची ध्वनीचित्रफीत बनवून ती दाखवण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

‘हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चितच हे स्मारक उभारतील’, अशी आशा श्री. घनवट यांनी व्यक्त केली.