एस्.टी.च्या संपामुळे पुणे विभागाची २७ कोटी रुपयांची आर्थिक हानी !

संपामुळे झालेल्या राष्ट्रीय हानीचे दायित्व कोण घेणार ? – संपादक

पुणे – एस्.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी एस्.टी. कर्मचार्‍यांनी ८ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. पुणे शहरात नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी निमित्ताने प्रतिदिन ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे, तसेच ग्रामीण भागातील शाळा चालू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोचण्यासही अडचणी येत असून एस्.टी.च्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. एस्.टी. कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत असले, तरी १ मासापासून अधिक काळ चालू असलेल्या संपामुळे पुणे विभागाची अनुमाने २७ कोटी रुपयांची आर्थिक हानी झाली आहे.