(म्हणे) ‘आम्ही भारताप्रमाणे हिंसेच्या घटनांकडे दुर्लक्ष करत नाही !’

भारतात हिंसाचार करणार्‍या हाफीज सईदसारख्या असंख्य जिहादी आतंकवाद्यांना पोसणार्‍या पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांचे हास्यास्पद विधान !

भारतात पाकप्रमाणे अन्य देशांतील लोकांची जमावाकडून ईशनिंदेच्या नावाखाली अमानुष हत्या होत नाही, हे फवाद चौधरी का सांगत नाहीत ? – संपादक

पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या नागरिकाची ईशनिंदेच्या नावाखाली अमानुष हत्या केल्याच्या प्रकरणी पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ‘या घटनेवरील पाकिस्तानी समाज आणि सरकार यांची प्रतिक्रिया हेच स्पष्ट करते की, आम्ही भारत नाही’, असे विधान केले. फवाद चौधरी यांच्या या विधानाचा अर्थ आहे की, भारतात मुसलमानांच्या विरोधात सातत्याने हिंसा घडत असून भारत त्याकडे लक्ष देत नाही; परंतु पाकने श्रीलंकेच्या नागरिकाच्या घटनेविषयी लगेच प्रतिसाद दिला. ‘पाकचे सरकार प्रत्येक अल्पसंख्यांक समुदायाला संरक्षण देण्यास बांधील आहे’, असेही फवाद चौधरी म्हणाले. (पाक सरकार अल्पसंख्यांक समुदायाला संरक्षण देत असते, तर तेथील हिंदूंचा वंशसंहार झाला नसता आणि हिंदु तरुणींचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर झाले नसते ! – संपादक)