(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे !’ – एम्.आय.एम्.

बिहार विधानसभेत ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास एम्.आय.एम्.च्या आमदारांचा विरोध !

  • जो खर्‍या अर्थाने या देशाच्या भूमीवर प्रेम करतो आणि तिला आपले मानतो, तो कधीही ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार नाही; मात्र जे विरोध करत आहेत, त्यांनी कितीही ते या भूमीवर प्रेम करत असल्याचे दाखवले, तरी ती ढोंगबाजीच आहे, हे लक्षात घ्या !
  • देशातील धर्मांध धर्माचे नाव पुढे करून ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करत आले आहेत. त्यांना निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीच विरोध करत नाहीत किंवा त्यांना ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !
बिहार विधानसभा

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता ४ डिसेंबर या दिवशी झाली. या वेळी ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने अधिवेशनाची सांगता होण्यावर असदुद्दीन ओवैसी यांच्या एम्.आय.एम्. पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे. राज्यघटनेत असे काहीही लिहिलेले नाही. हे आमच्या परंपरांच्या विरोधात आहे. यापूर्वीही सदनाच्या आतमध्ये हे गीत कधीच गायले गेले नाही. आता एक नवी परंपरा चालू केली गेली आहे, जिची काहीही आवश्यकता नव्हती’, अशा शब्दांत एम्.आय.एम्.चे आमदार अख्तरुल ईमान यांनी ‘वन्दे मारतम्’ला विरोध केला.

ईमान पुढे म्हणाले की, देशाच्या राज्यघटनेत प्रेम आणि बंधुभाव यांचा उल्लेख आहे. त्यात सर्व धर्मांचा मान राखण्याचा उल्लेख आहे; म्हणूनच मी ‘वन्दे मातरम्’ गात नाही आणि कधीच गाणार नाही; मात्र यामुळे आमच्या देशभक्तीवर कुणीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. आमची या देशावर निष्ठा असून कुणीही आमच्यावर ‘वन्दे मातरम्’ गाण्यासाठी बळजोरी करू शकत नाही.

आमदार हरिभूषण ठाकूर

एम्.आय.एम्.ला देशाला तालिबान बनवायचे आहे ! – भाजप 

एम्.आय.एम्.च्या आमदारांची ही भूमिका तालिबानी पद्धतीची आहे. त्यांना या देशालाही ‘तालिबान’ बनवायचे आहे. जिहादी आणि जातीवादी व्यक्तींकडून यापेक्षा अधिक अपेक्षा ठेवताही येणार नाही. त्यांचे ना या देशावर प्रेम आहे आणि ना या देशाच्या परंपरांवर, अशा शब्दांता भाजपाचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी ईमान यांच्यावर टीका केली.