हमीभाव घेतल्याविना शांत बसणार नाही ! – शेतकरी नेत्यांची भूमिका

‘भारतीय किसान युनियन’चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत

मुंबई – संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने आझाद मैदान येथे ‘किसान-मजदूर महापंचायत’ (सभा) आयोजित करण्यात आली होती. या वेळी शेतकरी नेत्यांसह शेतकरी, शेतमजूर यांनी शेतमालाला हमीभाव घेतल्याविना शांत बसणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

या प्रसंगी शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, ‘सरकारने हमीभाव कायदा संपूर्ण देशात लागू केला पाहिजे.’ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या, ‘७०० शेतकरी आंदोलनामध्ये हुतात्मा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमच्या संघर्षासमोर झुकावे लागले. दळणवळण बंदीमध्ये संसदेत २० हून अधिक विधेयके (बिल) संमत झाली आहेत. ती सर्व आस्थापनांच्या हिताची आहेत. देशातील हिंसेला पंतप्रधान उत्तरदायी आहेत. ७ डिसेंबर या दिवशी संसदेत शेतीविषयीच्या कायद्याच्या संदर्भात कशा प्रकारे निर्णय घेतला जातो, ते पाहून  आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे.’’

शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले, ‘‘देशाच्या शेतकर्‍यांनी एक वर्षाचा संघर्ष केल्यानंतर ऐतिहासिक विजय मिळवला. सरकारने शेतीविषयीचे ३ कायदे रहित करून पिकाला हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांना हानीभरपाई द्यावी.’’ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संपावरून कामगारांवर दडपशाही चालू आहे. ही दडपशाही अशीच चालू राहिल्यास महाराष्ट्र बंद करावा लागेल.’’