२६/११ चे मुंबईवरील आक्रमण हे आतंकवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारे होते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इतर मंत्री आणि मुंबई पोलीस यांसह हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली

मुंबई – २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी आतंकवाद्यांनी मुंबईवर आक्रमण केले होते. हे आक्रमण आतंकवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारे होते, अशी निर्भत्सना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईवरील आतंकवादी आक्रमणात वीरमरण पत्करलेले हुतात्मा वीर आणि या आक्रमणात बळी पडलेले नागरिक यांना उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. हे आक्रमण परतवून लावण्यासाठी निकराचा लढा देणार्‍यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ‘पोलीस आणि एनएसजी कमांडो यांनी गोळ्या झेलून अनेक आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. शौर्य, धैर्य आणि समर्पण यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा अन् कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

(सौजन्य : India Today)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इतर मंत्री आणि मुंबई पोलीस यांसह हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. ‘महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने’च्या वतीने ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.