हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संबंधित लोकांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

  • राजकीय दबावाखाली पोलीस एकांगी कारवाई करत आहेत !

  • अमरावती हिंसाचार प्रकरण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

अमरावती – अमरावती येथे झालेल्या हिंसाचाराची घटना दुर्दैवी आहे. १२ नोव्हेंबरची घटना नष्ट करून १३ नोव्हेंबरच्या घटनेत जे लोक सहभागी झाले, तेवढेच पाहिले जात आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संबंधित लोकांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. राजकीय दबावाखाली पोलीस एकांगी कारवाई करत आहेत. त्यामुळे या कारवाईचा आम्हाला निषेधही करावा लागेल. जर अशीच कारवाई होत राहिली, तर भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते ‘कारागृह भरा’ आंदोलन करतील, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. १२ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या हिंसाचाराविषयी सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे ?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,

१. महाराष्ट्रात अराजकता सिद्ध होऊन दंगे झाले पाहिजेत, अशा मानसिकतेततून सिद्ध केलेला १२ नोव्हेंबरचा हा कट होता का ?, याची चौकशी झाली पाहिजे.

२. १२ नोव्हेंबर या दिवशी कुणाच्या अनुमतीने मोर्चा निघाला ? किती लोकांना त्यात संमती आणि अनुमती देण्यात आली होती ? हे सर्व स्पष्ट झाले पाहिजे. सरकारने ते सांगितले पाहिजे.

३. चुकीच्या घटनेसाठी जर लांगूलचालन होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. जे लोक या हिंसाचारात नव्हते त्यांनाही यात गोवण्यात येत आहे. एका महिलेने मला सांगितले की, माझा मुलगा केवळ गाडी घराच्या आतमधे घेऊन येत होता; मात्र त्याला पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर कलम ३०७ लावण्यात आले. हा इतका मोठा गुन्हा होता का ?, हे न पडताळता त्याला अटक झाली आहे. अनेकांना विविध गुन्ह्यांमध्ये अडकवले जात आहे. लक्ष्य करून आणि सूची सिद्ध करून तरुणांवर गुन्हे नोंद केले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचे आरोप दायित्वशून्यतेचे ! – यशोमती ठाकूर, मंत्री, महिला आणि बालकल्याण

मुंबई – १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी अमरावती येथे घडलेली घटना निंदनीय आहे. ज्यांनी आंदोलन भडकवण्याचे काम केले, त्यांना सोडणार नाही. दोन्ही समाजातील (हिंदु-मुसलमान) नागरिकांवर गुन्हे नोंद होत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप दायित्वशून्यतेचे आहेत, असे प्रतिपादन अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला अन् बालकल्याणमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले. त्या पुढे म्हणाल्या की, रझा अकादमीचा लाभ कोणाला होतो ?, ते देशाला ठाऊक आहे. हिंसाचाराविषयी गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत. कुणाच्याही आंदोलनाला अनुमती दिली नव्हती. अमरावती येथे कुणीही राजकीय भाषा करू नये. अमरावती आता शांत झालेली असून आम्हाला ती शांतच ठेवायची आहे.